Jaya Bachchan : मागच्या दोन दिवसांपासून देशातील राजकारणात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदारांनी केलेल्या वर्तणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. हे सगळे खासदार लोकसभा आणि राज्यसभेतले आहेत. लोकसभेतील घुसखोरी प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदन द्यावं. ही मागणी विरोधी पक्षातले खासदार करत होते. त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच कारवाईच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन या चांगल्याच संतापल्या आहेत. याविषयी प्रतिक्रिया देताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
जया बच्चन यांनी खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईविषयी बोलताना,“सरकारने लोकशाहीची चेष्टा करत निलंबनाची कारवाई केली आहे. विरोधी पक्षच नसेल तर ती लोकशाही म्हणायची का? लोकशाही तेव्हाच असते जेव्हा संसदेला होय आणि नाही अशा दोन्ही बाजू असतात. या सरकारने निलंबनासाठी नेमके कोणते निकष लावले आहेत? ते तरी समोर आणलं पाहिजे. सोमवारी अनेक खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर मंगळवारीही विशिष्ट खासदारांना निलंबित करण्यात आलं. वेल मध्ये उतरल्याने सोमवारी निलंबनाची कारवाई झाली. मंगळवारीही लोक वेलमध्ये उतरले होते त्यांच्याविरोधात कारवाई का झाली नाही? मी अध्यक्षांना हाच प्रश्न विचारत होते की खासदारांना निलंबित करण्याचे तुमचे मापदंड काय आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
#WATCH | Delhi: On opposition MPs suspended from the Parliament for the remainder of the winter session, Samajwadi Party MP Jaya Bachchan, says “It is a mockery of democracy. If there is no opposition, then what is democracy? Democracy is when the Parliament has both sides, Yes… pic.twitter.com/h4N7KX6P4i
— ANI (@ANI) December 19, 2023
तसेच जया बच्चन यांनी, “मी त्यांना सातत्याने सर आम्हाला बोलू द्या म्हणत होते. विनंती करत होते. तरीही त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला आता मॅडम म्हणणार. रामगोपाल यादव यांच्यासारखे वरिष्ठ खासदार हे गोंधळ सुरु झाल्यावर ते बाजूला उभे राहिले. ते त्यांच्या शिस्तपालनासाठी ओळखले जातात. स्पीकरने त्यांना वेळ संपली बसा सांगितलं तर त्यांचं वाक्यही पूर्ण करत नाहीत खाली बसतात. इतक्या शिस्तीत वागणाऱ्या यादव यांचं निलंबन कुठल्या निकषांवर केलं? वंदना चव्हाण या शिस्तपालनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनाही निलंबित केलं. काय खिचडी शिजते आहे माहीत नाही.” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
संसदेच्या सुरक्षाभंगाच्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनासाठी गेल्या आठवड्यापासून विरोधी सभागृहामध्ये आक्रमक झाले आहेत. अशातच काल लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४१ पर्यंत पोहोचली आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमधून खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.