मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून 14 लाखांचा धनादेश सुपुर्द
कुडाळ – सातारा जिल्ह्यासह मुंबई येथे माथाडी कामगारांची अर्थवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बॅंकेच्यावतीने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हाथ म्हणून बॅंकेच्यावतीने 11 लाख 21 हजार रुपयांचा धनादेश तसेच कर्मचारी वर्ग यांच्यावतीने को ऑप बॅंक एम्लॉईज मुंबई यांच्यातर्फे 3 लाख असे एकूण 14 लाख 21 हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून सुपुर्द करण्यात आला. बॅंकेच्यावतीने करण्यात आलेली ही मदत पूरग्रस्तांसाठी लाखमोलाची ठरणार आहे.
बॅंकेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे म्हणाले, जावळी बॅंकेला सांप्रदायिकतेचा वारसा असून ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज आणि स्वगींय भिलारे गुरूजी यांच्या विचारांची जोपासना करत बॅंकेची वाटचाल सूरू राहिली आहे. त्याचाच भाग म्हणून ही मदत देण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण होऊन सर्वत्र हाहाकार माजवला होता. तेथील सामान्य जनजीवन बाधित झालेले असताना तसेच तेथील मालमत्तेची व जीवित हानीदेखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याने या सर्वं गोष्टींची दखल घेत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या दृष्टिकोनातून संचालक मंडळाने त्यांना मदत देण्याचे ठरविण्यात आले होते.
बॅंकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे उपाध्यक्ष तसेच माजी खासदार आनंदराव आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने बॅंकेच्यावतीने आणि 11 लाख 21 हजार रुपये तसेच कर्मचारी वर्ग यांच्यावतीने को आँप बॅंक एम्लॉईज मुंबई यांच्याकडे रूपये 3 लाख असे एकूण 14 लाख 21 हजार रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी महाराष्ट्र राज्य ज्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, जावळी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे, उपाध्यक्ष प्रकाश मस्कर, माजी अध्यक्ष विक्रम भिलारे यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.