नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची तुलना तालिबानशी केल्यामुळे वादात सापडलेले प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असे भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.
संघ परिवाराशी संबंधित लोकच सरकार चालवत आहेत. जर त्यांच्यात तालिबानी विचारसरणी असती तर ते असे वक्तव्य करू शकले असते का ? संघाबाबत हे वक्तव्य करण्यापूर्वी अख्तर यांनी हा विचार करायला पाहिजे होता. यातूनत अख्तर यांच्या विधानातील पोकळपणाच दिसून येतो आहे, असे कदम म्हणाले. जोपर्यंत अख्तर हात जोडून माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचा कोणताही चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
“ज्याप्रमाणे तालिबानला इस्लामिक स्टेट पाहिजे, त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्राची अपेक्षा करणारेही देशात आहेत.हे लोक समान मानसिकतेचे आहेत. मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू अथवा हिंदूही असतील.’ असे अख्तर यांनी म्हटले होते. तालिबानी निश्चितपणे क्रूर आहेत आणि त्यांची कृती निंदनीयच आहे. मात्र संघ, विहिंप आणि बजरंग दलाचे समर्थन करणारेह याच मानसिकतेचे आहेत, असे अख्तर म्हणाले होते.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याबद्दल काही मुस्लिम नेत्यांनी स्वागत केले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्याबद्दल अनेक मुस्लिमांना धक्का बसला होता. ते घाबरलेही होते. देशातील मुस्लिमांना चांगला रोजगार आणि चांगले शिक्षण हवे आहे. मात्र देशात काही प्रतिगामी विचारसरणीचेह लोक आहेत. महिला आणि पुरुषांना वेगळे समजले जाते. अशा लोकांना जे करायचे आहे, ते त्यांना करु द्यावे. त्यांचे लक्ष्य ते कधीही गाठू शकणार नाहीत, असे अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.