Nasiruddin Shah : अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र अभिनयासह नसिरुद्दीन शाह आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी बॉलीवूडबाबत एक विधान केले आहे. दर्जेदार चित्रपट निर्माण होणे बंद झाले असल्याने आपण चित्रपट पाहत नसल्याचे वक्तव्य करत नसिरुद्दीन यांनी पुन्हा एकदा बॉलीवूडवर निशाणा साधला आहे.
एका मुलाखतीदरम्यान नसिरुद्दीन शाह म्हणाले की, “हिंदी चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याचा अभिमान वाटतो. पण एकाच प्रकारचे चित्रपट बनवत असल्याचे वास्तव पाहून माझी खूप निराशा होते. म्हणूनच मी हिंदी चित्रपट पाहणं बंद केले आहे. मला ते अजिबात आवडत नाहीत. हिंदुस्तानी जेवणाला प्रत्येक ठिकाणी पसंत केलं जातं, कारण त्यात दम आहे. पण हिंदी चित्रपटांमध्ये दम का नाही?”, असा सवाल त्यांनी केला.
“जगभरातील भारतीय हिंदी चित्रपट पाहतात, कारण त्यांना आपल्या घराशी जोडल्याची भावना निर्माण होते. काही गंभीर विषय मांडणारे चित्रपट सध्या काही हजार प्रेक्षक पाहतात, असे काही चित्रपट येतील आणि हा प्रेक्षक वर्ग पाहतील. पण, हे किती काळ चालेल याची कल्पना नाही.”
पुढे ते म्हणाले, “गंभीर विषयांवर चित्रपट करणाऱ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी सध्याची वास्तविकता चित्रपटातून दाखवावी आणि ती अशा पद्धतीने दाखवावी की बदल्यात तुमच्या विरोधात कोणताही फतवा किंवा तुमचे दार ईडीने ठोठावू नये. इराणी चित्रपट निर्मात्यांनी अधिकाऱ्यांच्या दडपशाहीला न जुमानता चित्रपट बनवले आणि भारतीय व्यंगचित्रकार आरके लक्ष्मण आणीबाणीच्या काळात व्यंगचित्रातून परिस्थिती मांडत होते, याची आठवण भारतीय चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना यांनी करून दिली. हिंदी चित्रपटांसाठी तेव्हाच थोडीफार आशा निर्माण होईल जेव्हा ते फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने चित्रपट बनवणं बंद करतील. पण मला असं वाटते की आता खूप उशीर झाला आहे.”