करण जोहरचे होम प्रॉडक्शन असलेल्या “दोस्ताना 2’ची गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चा सुरू आहे. या सिनेमातून करण जोहरने कार्तिक आर्यनला बाहेर काढले. त्याचवेळी या सिनेमाबाबतचा वाद सुरू झाला. कार्तिक आर्यन अगदी “अनप्रोफेशनल’ असल्याचे करण जोहरने म्हटले होते. त्याच्या जागेवर अक्षय कुमारची निवड झाल्याचेही समजले होते.
“दोस्ताना 2′ बाबत करण जोहरने वशिलेबाजी केली असल्याची टीका व्हायला लागली होती. हा वाद संपवण्यासाठी आता करण जोहर एक मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. “दोस्ताना 2’मध्ये जान्हवी कपूरपण आहे. आप्ल्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी आता जान्हवीचीही छुट्टी केली जाणार असल्याचे समजते आहे.
करण जोहरने जान्हवीच्या निवडीसाठी क्रिएटिव्ह टीम आणि दिग्दर्शकाशी खूप वाद घातला होता. त्याने केलेल्या निवडीमध्ये अक्षय कुमार, राजकुमार राव, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सिद्धांत चतुर्वेदीचा समावेश आहे. आता नेपोटिझमचा मुद्दा कोणीही उपस्थित करू नये, यासाठी आता आपल्या या स्टारकास्टमध्ये कोणीही वशिलेबाजी केलेले असू नये, यासाठी जान्हवीला बाहेर काढण्याचा करणचा विचार आहे.