नवी दिल्ली – देशभरात अन्नधान्याची महागाई झपाट्याने वाढत आहे. या महागाईच्या काळात खाद्यपदार्थांच्या दरातही मोठी वाढ दिसून आली. तांदूळ, गहू, मैदा, डाळींसह सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात किरकोळ बाजारात गहू आणि डाळींच्या किमती 5% आणि 4% वाढल्या आहेत. त्याचबरोबर पामतेल वगळता जवळपास सर्व खाद्यतेलाच्या किमतीतही या काळात वाढ झाली आहे. दुसरीकडे तांदळाच्या दरात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वर्षभरापूर्वी गव्हाचा भाव 28.19 रुपये प्रति किलो होता. मात्र यंदा त्याचे भाव वाढतच गेले. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, “अलिकडच्या काही महिन्यांत देशात गहू आणि डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या सरासरी किरकोळ किमतींमध्ये कोणतीही तीव्र आणि शाश्वत वाढ झालेली नाही. गोयल यांच्या म्हणण्यानुसार, 6 डिसेंबर रोजी गव्हाची सरासरी किरकोळ किंमत 31.90 रुपये प्रति किलो होती, जी महिन्यापूर्वी 30.50 रुपये होती. मात्र, हे अर्धसत्य असल्याचे दिसून येत आहे. आता गव्हाची किंमत 33 रुपये प्रतिकिलो झाल्याचे दिसून येत आहे.
गव्हाचे भाव वाढले असतील तर त्याचा परिणाम पिठाच्या किमतीवरही झाला असणार हे उघड आहे. सरकारच्या किमती निरीक्षण प्रणालीच्या आकडेवारीनुसार, एका महिन्यापूर्वी 35.20 रुपयांच्या तुलनेत पीठाची किंमत 6% ने वाढून 37.40 रुपये प्रति किलो झाली आहे.
डाळींच्या किमतीत बदल –
गेल्या महिनाभरात डाळींच्या दरातही टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यापूर्वी हरभरा डाळीची सरासरी किंमत 110.90 रुपये प्रति किलो होती, मात्र 6 डिसेंबरपासून ती 112.80 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. दुसरीकडे तूरडाळीच्या दराने मोठी झेप घेतली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी तूरडाळीचा भाव 103.8 रुपये प्रति किलो होता. पण आजच्या काळात त्याची किंमत 112.75 रुपये प्रति किलो झाली आहे.
महिनाभरापूर्वी तांदळाचा भाव 38 रुपये प्रतिकिलो होता, मात्र आज त्याचा भाव 40 रुपये किलो झाला आहे. वर्षभरापूर्वीच्या तांदळाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्यावेळी त्याची किंमत प्रति किलो 32 रुपये होती. राजकारण्यांच्या निवडणुका होतात, आरोप-प्रत्यारोप आणि यात्रा होत राहतात, मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणीही नसतो, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.