अखनूर सेक्टर – घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. २२ आणि२३ डिसेंबरच्या रात्री चार दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. सतर्क सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाली दिसल्या आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आहे. तर तिघे मागे पळून गेले. तिन्ही दहशतवाद्यांनी मृत दहशतवाद्याचा मृतदेह ओढून नेला.
पूंछ-राजोरी सेक्टरमध्ये २५ ते ३० पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय असल्याचा संशय लष्कराने व्यक्त केला होताच. या सेक्टरमध्ये पसरलेल्या घनदाट जंगले आणि नैसर्गिक गुहांना दहशतवादी आपले अड्डे बनवत असल्याचे मानले जात आहे. २०२० मध्ये, चीनसोबत बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताने राष्ट्रीय रायफल्सच्या तुकड्या पुंछ सेक्टरमधून लडाखमध्ये हलवल्या होत्या. लडाख सेक्टरमधून सैन्य मागे घेण्यासाठी आणि या प्रदेशात पुन्हा सैन्य तैनात करण्यासाठी भारतीय लष्करावर दबाव आणण्यासाठी पूंछ आणि राजौरी भागातील दहशतवादी कारवायांना पुनरुज्जीवित करण्याचा कट पाकिस्तान आणि चीनने रचला आहे.
गेल्या काही वर्षांत लष्कर लडाखच्या ऑपरेशनसाठी रवाना झाले आहे. दरम्यान, भारताला या भागात आपले सैन्य पुन्हा तैनात करण्यास भाग पाडण्यासाठी पाकिस्तानने भारतीय सैन्यावर हल्ले करण्यासाठी राजौरी-पुंछ भागात पाकिस्तानातून आपले दहशतवादी पाठवण्यास सुरुवात केली. जम्मू विभागातील पुंछ आणि राजोरी जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी टीम पुंछमधील बाफलियाजमध्ये घटनास्थळी पोहोचली आहे.