श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी भाजपचा सरपंच आणि त्याच्या पत्नीची हत्या केली. अनंतनाग जिल्ह्यामध्ये घडलेल्या त्या खळबळजनक घटनेमागे लष्कर-ए-तोयबा ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट झाले.
भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या सरपंच गुलाम रसूल डार यांच्या घरात तोयबाचे दोन दहशतवादी घुसले. त्यांनी डार आणि त्यांच्या पत्नीवर बेछूट गोळीबार केला. गोळीबारानंतर दहशतवादी दुचाकीवरून पसार झाले. जखमी डार दाम्पत्याला तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मागील काही काळापासून दहशतवादी सुरक्षा जवानांबरोबरच नागरिक आणि राजकीय नेते-कार्यकर्त्यांनाही लक्ष्य करत आहेत. चालू वर्षात दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत भाजपच्या चार नेत्यांची हत्या केली आहे.
मागील वर्षी दहशतवाद्यांनी भाजपच्या सहा नेत्यांची हत्या केली. त्या घटनांमुळे भाजप आणि विविध पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मात्र, सुरक्षाविषयक त्रुटींचा गैरफायदा उठवून दहशतवादी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचे सूचित होत आहे.