आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725 व्या संजीवन समाधी वर्षानिमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व ह.भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या संकल्पातून या महामारी च्या काळात 108 घरी जाऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसाद देण्याचे कार्य सुरू आहे.
आज दि.09 ऑगस्ट श्रावण सोमवार रोजी 29 वे पुष्प संपन्न झाले. यामध्ये 9 व्या व 12 व्या अध्यायाचे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण व ह.भ.प. भागवत महाराज साळुंखे यांच्या सुमधुर वाणीतुन समर्पिली वाणी, पांडुरंगे घेते धनी। पूजा होते मुक्ताफळी, रस ओविया मंगळी। पूर्ण आहुती जीव, तुका घेऊनी ठेला भाव।। या जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगावर कीर्तन सेवा संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील व त्यांचा समूह श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजितभाऊ वडगावकर ,संस्था विश्वस्त व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाशजी काळे आदी उपस्थित होते. यानिमित्ताने अजितभाऊ वडगावकर व प्रकाशजी काळे यांनी कार्यक्रमाची महती सांगत संतांचा महिमा तसेच मानवी जीवनात ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या महान विचारांची आवश्यकता यावर आपले विचार व्यक्त केले व चाललेल्या या महान कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.