मुंबई – महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला सोडत इतर पक्षांशी हात मिळवणी केली. यानंतर नुकतेच सत्तेत बाहेर पडलेल्या शिवसेनेने नितीश कुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत ‘नितीशकुमार आगे बढो’ अशी हाक दिली आहे. मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेने नितीशकुमारांची जोरदार पाठराखण केली आहे.
बिहारात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली आहे. बिहारातदेखील महाराष्ट्राप्रमाणेच ‘शिंदे’ गट वेगळा करून भाजपचे दिल्लीश्वर नितीश कुमार यांना मात देण्याचे कारस्थान करीत होते. त्यासाठी नितीश कुमार यांचे ‘शिंदे’ आर.सी.पी. सिंग यांना हाताशी धरून पोखरापोखरीचे काम सुरूच केले होते, पण नितीश कुमार यांनी भाजपलाच धोबीपछाड देणारी पलटी मारली आहे. असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.
भाजपने बाजी मारली पण तेजस्वी यादवने मैदान सोडले नाही. आता नितीश कुमार याच्या बरोबरीने ते सरकार बनवत आहेत. ही आघाडी २०२४ मध्ये अशीच भक्कम राहिली तर लोकसभा निवडणुकांचे निकाल बदलू शकतात. हे सत्य आहे. महाराष्ट्रातील ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेप्रमाणे श्री नड्डा यांची ‘आम्हीच येऊ,फक्त आम्हीच येऊ’ ही घोषणा आहे. असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे. तसेच लोकशाहीत मतपेटीच्या मार्गाने कोणीही येऊ शकते पण आम्हीच येऊ असे सांगणारे लोकशाही मानतात काय ? असा सवाल देखील सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात ‘जेडीयू’चे राज्यसभा सदस्य आर.सी.पी. सिंग यांचा समावेश नितीश कुमार यांच्या मनाविरुद्ध होता, पण सिंग यांना बळ देऊन भाजपास बिहारात नितीश कुमारांना अस्थिर करायचे होते. हे लक्षात येताच नितीश कुमार यांनी दिल्लीशी संपर्कच तोडला. दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे दाखवले व मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या किमान पाच बैठकांना गैरहजर राहिले. महाराष्ट्रातील सध्याच्या गुडघेटेकु मुख्यमंत्र्यांनी हा बाणा समजून घेतला पाहिजे असे खडेबोल सामनातून सुनावण्यात आले आहेत.