एकदा आम्हा सर्व मैत्रिणींना आमच्या एका मैत्रिणीच्या घरी काही समारंभानिमित्तानं बोलावलं होतं. तिनं सहा वाजता बोलावलं होतं आणि सहा वाजून गेले तरी आम्ही एकेकजण जमत होतो. मी म्हटलं, “ए, चला नं लवकर, तिनं सहाला बोलावलंय आपल्याला… वाट बघत असेल ती आपली!’ पटकन एकजण उद्गारली, “अगं चालतंय, आपलीच आहे…!’ आपली माणसं, आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश म्हणजे काय? बहुसंख्य भारतीय लोकांची आपुलकीची व्याख्या म्हणजे “जिथं कसंही वागलं तरी चालेल, ते “आपलं’!’ अशी असते. आपणच रस्त्यात कागदाचा बोळा टाकतो, गाडीतून पिंक टाकतो आणि म्हणतो, “परदेशात असलं काही चालत नाही हां…!’ “मग इथं चालतं का?’ तर हो, चालतं, कारण हा आपलाच देश आहे. इथं सार्वजनिक स्वच्छता पाळली नाही तरी चालते, कर्णकर्कश आवाज केले तरी चालतात, वेळ पाळली नाही तरी चालते. आपल्याला काय कसंही चालतं… आपणच आपलं अवमूल्यन करायचं.
आपण सगळेजण बऱ्याच गोष्टीत चालढकल करीत असतो. गंमत अशी की, दुसऱ्याकडून आपल्या कामाची खोटी झाली, उशीर झाला की आपण रागावतो. कार्यक्षमता वाढली पाहिजे, वक्तशीरपणा असला पाहिजे हे सगळे आपल्याला आठवते. पण आपल्याकडून दुसऱ्याची गैरसोय होऊ नये, त्याचा कामाचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो?
स्वामी विवेकानंदांनी भारतीयांची मन:स्थिती अचूक ओळखली होती. त्यांनी एकेठिकाणी म्हटले आहे, “काम करण्याची कडक व काटेकोर पद्धती आपण अजून शिकलो नाही. काम म्हणजे काम. मग तेथे मैत्री, भीड उपयोगाची नाही.’ हा बाणा आपण ठेवला, तर आपली प्रगती झपाट्याने होईल यात शंका नाही. पण मूळ मुद्द्याला बगल देण्याची वृत्ती आपल्या भारतीयांच्या हाडीमाशी खिळून राहिलीय. त्यामुळे आपले वैयक्तिक नुकसान तर होतच असते पण घरात, नातेवाईकांमध्ये, कामाच्या ठिकाणी सगळीकडेच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. कार्यक्षमतेबाबतच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्या ठिकाणी परस्परांमध्ये दोस्तीचे नाते असते, फार जवळचे नाते असते तिथली कार्यक्षमता संकुचित राहते. कारण सगळेच, “चालतंय, आपलंच आहे…’ या मूडमध्ये असतात. अनेकदा कर्तबगारीपेक्षा ज्येष्ठतेला महत्त्व मिळते.
वेळ पाळण्याच्या बाबतीत तर आपण फारच बेफिकीरपणे वागतो. ही वृत्ती फक्त व्यक्तीचे नुकसान करीत नाही, ते नुकसान पर्यायाने संपूर्ण देशाचे असते. आपल्याला जे काही करायचे आहे, ते जबाबदारीने, उत्तमात उत्तम करण्याने तुम्हाला मानसिक समाधान तर मिळतेच; पण दुसऱ्यांचेही तुम्ही काही देणे लागता ना? त्यांना तुम्ही तुमच्याकडचे उत्कृष्ट असेल ते द्यायला हवे ना? आपण भारतीय लोक समारंभप्रिय आहोत. सभा भरवायच्या, भाषणं आयोजित करायची हा आपला आवडता उद्योग. अशा ठिकाणी भाषण देण्यासाठी ज्यांना बोलावलेलं असतं, त्यांनी खरोखरच ज्या विषयावर बोलायचंय, त्याबाबत किती तयारी केलेली असते? कित्येकदा अशा ठिकाणी मान्यवर लोकांनाच बोलावलेलं असतं. आपल्या असं लक्षात येतं की, आतापर्यंतच्या ज्ञानाच्या बळावरच हे लोक प्रत्येक सभेमध्ये तेच तेच बोलत असतात. काळ बदलतो, समाजात नवीन गोष्टी सुरू झालेल्या असतात, श्रोतृवर्ग नवीन पिढीचा असतो. पण आपल्याला कोणते नवीन मुद्दे सांगता येतील, किती वेळ बोलायचे आहे आणि त्यात महत्त्वाचे असे आपण काय सांगू शकू; यावर किती वक्ते टिपणे काढतात? बहुतेकदा “आपलेच आहेत…’ म्हणून वक्ते वेळ निभावून नेताना दिसतात.
या संदर्भात मला एक प्रसंग आठवतो. एकदा आम्ही आमच्या चर्चामंडळात एका साक्षेपी संपादकांना भाषणासाठी बोलावलं होतं. आम्ही सगळे जमल्यावर त्यांनी विषयाचं नाव सांगितलं आणि चक्क फळ्यावर आपल्या भाषणात ते कोणत्या मुद्द्यांचा परामर्ष घेणार आहेत, ते लिहिलं. मग म्हणाले, “या प्रत्येक मुद्द्याला मी साधारणपणे दहा मिनिटं देणार आहे, म्हणजे तुम्ही मला दिलेल्या वेळात… साधारण तासाभरात… माझं भाषण मी संपवीन, चालेल ना?’ त्याहीपुढचा कळस म्हणजे त्यांचा प्रत्येक मुद्दा खरोखरच बरोब्बर दहा मिनिटात संपायचा आणि ते पुढच्या मुद्द्याला सुरुवात करायचे. आम्ही ऐकणारे अक्षरशः चक्रावून गेलो.
इतके गांभीर्यपूर्वक केलेले भाषण आमच्या चर्चामंडळात मी प्रथमच ऐकत होते. भाषण संपल्यानंतर मी त्यांना फोन केला आणि याचा आवर्जून उल्लेख केला. तेव्हा ते म्हणाले, “यात खरं तर विशेष असं काही नाही. आपण सगळ्यांनीच आपापलं कर्तव्य चोख पार पाडलं पाहिजे. मी जर दिलेल्या वेळेपेक्षा आणखी दहा मिनिटं घेतली असती तर तुम्हांपैकी प्रत्येकाची कामाची दहा मिनिटं असा एकूण केवढा कार्यक्षमतेचा वेळ माझ्या खात्यावर जमा झाला असता!’ असा विचार आपण किती वेळा करतो? प्रत्येकानं जर असा दुसऱ्याच्या अपेक्षांचा विचार केला, आपले काम चोख पार पाडले, तर सगळ्यांचाच त्यात लाभ नाही का? प्रत्येक माणसाची शक्तीबुद्धी योग्य ठिकाणी वापरली गेली तर त्यातून आपण किती प्रगती साधू शकू? बघा, हिशोब करा, आपलेपणानं विचार करा.
माधुरी तळवलकर