पुणे – कामामध्ये चुका काढण्यापेक्षा, ती कामे पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज निरोप समारंभाच्या कार्यक्रमात केले. आयुष प्रसाद यांची जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेकडून निरोप समारंभाचे शनिवारी आयोजन केले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, माजी सभापती बाबुराव वायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, डॉ. इंद्राणी शर्मा आदी उपस्थित होते. प्रसाद म्हणाले, शाळांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी कार्यक्रम आखला. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला. करोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण राहिले. 42 कर्मचाऱ्यांचा कोरोनामध्ये मृत्यू झाले, ते माझ्या एका सहीने कामास गेले होते.
तुमच्यामुळे आजार कळला…
सकाळी एक अनोळखी फोन आला. साहेब मी तुम्हाला ओळखत नाही, पण फोन नंबर मिळवून तुम्हाला फोन केला. मला किंवा आमच्या कुटुंबीयांना माहिती नव्हतं की आमच्या बाळाला हृदयाचा त्रास आहे. तुमच्यामुळे जिल्हा परिषदेकडून बाळांच्या झालेल्या आरोग्य तपासणीमध्ये हृदयाचा आजार कळला आणि त्यावर तुमच्याकडून चांगल्या प्रकारे उपचार झाले, हा संवाद आयुष प्रसाद यांनी मनोगतात सांगितला.