पुणे – पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष प्रसाद यांनी आतापर्यंतच्या पुणे जिल्हा परिषदेचे सर्वाधिक काळ म्हणजे साडेतीन वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. दरम्यान, आर. एस. चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.
आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्हा परिषदेत शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्याचबरोबर दिवसांमध्ये विकासकामांचा निधी संपवण्याचा उपक्रमदेखील त्यांनी घेतला होता. ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर उभारून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींसाठी निवासी शाळा उभारण्याची प्रक्रिया त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाली आहे. जिल्ह्यात विविध उपययोजना करत जिल्ह्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल केली. याशिवाय मुलांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम देखील त्यांनी राबविल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेत वाढ देखील झाली. गेल्या काही महिन्यांपासून आयुष प्रसाद यांची बदली होणार असल्याची चर्चा होती.
पुणे जिल्हा परिषदेत सर्वोत्तम कामगिरी केल्याचा आनंद आहे. मात्र, करोना काळातील जिल्हा परिषदेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नाही, याची खंत मनात कायम आहे, असे आयएएस अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.