नवी दिल्ली – सध्या देशात जेईई व नीट परीक्षेच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलच तापल्याच दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या व्हिडिओतून देशभरातील विद्यार्थ्यांना उद्देशून भाष्य केले आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांना विचारात घेऊनच घ्यायला हवा, असा सल्ला देखील सरकारला दिला आहे.
या व्हिडीओत सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, मला तुमच्याबद्दल वाईट वाटते. तुम्ही या क्षणी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरं जात आहात. तुमची परीक्षा केव्हा, कुठं आणि कशी होईल? हे केवळ तुमच्यासाठीच नाहीतर तुमच्या परिवारासाठी देखील महत्वपूर्ण आहे. तुम्ही आमचे भविष्य आहात. एका चांगल्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत.
अशावेळी तुमच्या भविष्याशी निगडीत कोणता निर्णय घ्यायचा असेल, तर हे महत्वाचे आहे की तुम्हाला विचारात घेऊनच तो घ्यायला हवा. मला अपेक्षा आहे की सरकार तुमचे म्हणणे ऐकेल, तुमचा आवाज ऐकेल व तुमच्या इच्छेनुसार काम करेल. हाच माझा सरकारला सल्ला आहे. जय हिंद! असे त्यांनी म्हटले आहे. या व्हिडिओखाली #SpeakUpForStudentSafety या हॅशटॅगचा वापर करण्यात आलेला आहे.