नवी दिल्ली – केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार पराभूत होणार आहे हे चित्र अगदी स्पष्ट झाले आहे असे कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. आज दिल्लीत आपल्या मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर त्या तेथे जमलेल्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की भाजपच्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये मोठा रोष आहे आणि तो प्रत्यक्ष मैदानावर स्पष्ट दिसत आहे. लोकांमध्ये राग आहे. लोक त्रस्त आहेत. पण मोदी त्यांच्या विषयी काहींच बोलत नाहीत असे त्या म्हणाल्या.
लोकांच्या समस्यांवर बोलण्याऐवजी ते दुसऱ्याच बाबींविषयी बोलत आहेत. त्यामुळे लोक चिडले आहेत. त्यांचा राग ते मतपेटीतून व्यक्त करणार आहेत हे आता स्पष्ट दिसते आहे. पंतप्रधानांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की मी 45 वर्ष तपस्या केली आहे त्यातून मी घडलो आहे. मला खान मार्केट ने घडवलेले नाही किंवा ल्युटियन्स क्लबने घडवलेले नाही त्या विषयी पत्रकारांनी प्रियांकांचे मत विचारले असता त्या चटकन म्हणाल्या की तुम्ही केवळ 50 तास जरी तपस्या केलेली असेल तर ती लोकांना सांगायची नसते. त्यांनी तितकी तपस्या केली असती तर त्यांच्या मनात इतका द्वेष भरलेला नसता असेही त्या म्हणाल्या. प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट यांनी आज लोधी इस्टेट मधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात जाऊन मतदान केले.
त्या म्हणाल्या की मोदींनी सन 2014 मध्ये जी आश्वासने दिली होती त्यावर आजच्या प्रचारात ते काहीही बोलत नाहींत. या निवडणुकीत त्यांनी नकारात्मक प्रचार केला. आम्ही लोकांच्या समस्यांना निवडणुकीचे मुद्दे केले पण त्यांनी महत्व नसलेल्या बाबींना महत्व देऊन लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला असे त्या म्हणाल्या. विरोधकांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न त्यांनी सातत्याने धुडकाऊन लावले. त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे का दिली नाहीत असा सवालही त्यांनी केला.