भाजपने डीलिट केले ट्विट
विरोधकांनी साधला निशाणा
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बालाकोट हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत भाष्य केले होते. या त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी मोदींना लक्ष्य करत त्यांची खिल्ली उडविली. दरम्यान, मोदींचे ते विधान गुजरात भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुनही ट्विट करण्यात आले होते. मात्र, सोशल मीडियामध्ये खिल्ली उडायला सुरूवात झाल्यानंतर ते ट्विट डीलिट करण्यात आले आहे.
हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता, अशाप्रकारचे विधान मोदी यांनी केले होते. या विधानावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही खरमरीत टोला लगावला असून फेसबुक पोस्टद्वारे खिल्ली उडवली आहे.
“मोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत! ढगात जर विमान रडारवर दिसलं नाही, किंवा रेडिओ तरंग तिथे पोचलेच नाहीत तर Air Traffic Controller त्यांना योग्य दिशा, उंची आणि बाकीची आवश्यक माहिती सांगणार कशी? येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा!’ अशाप्रकारची पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे.
दरम्यान, कॉंग्रेस, एमआयएमचे अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मार्क्सवादी पक्षाचे सीताराम येचुरी यांनी मोदींच्या विधानवरुन खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य अवमानकारक आहे. त्यांनी एअरफोर्सचा अपमान केला आहे. कोणताही देशभक्त व्यक्ती असे विधान कधीच करणर नाही, असे ट्विट करत येचुरी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.