नवी दिल्ली : आपल्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित होता, असे विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेषा घोष यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू विद्यापीटात घुसलेल्या हिंसक जमावाने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. त्यात घोष जखमी झाल्या.
पत्रकारांना घोष सोमवारी म्हणाल्या, हा पुर्वनियोजित हल्ला होता. ते माणसांना एकेकटे गाठून त्यांच्यावर हल्ला करत होते. जेएनयुची सुरक्षा व्यवस्था आणि दंगलखोर यांच्यात स्पष्टपणे संबंध होता. त्यांनी हा हिंसाचार थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
मला त्यांनी एकटे गाठले आणि लोखंडी सळईने वार केले. आमची हत्या होण्याची शक्यता होती. हल्लेखोरांकडे लोखंडी सळ्या आणि हातोडे होते. या हिंसक जमावाने विद्यापीठाच्या आवारातील अनेक वसतीगृहामध्ये तोडफोड केली. विद्यार्थ्यांनी या भागातील सहाय्यक पोलिस आयुक्तांना वेळीच सावध केले होते. मात्र तरीही पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही, असे त्यांनी सांगितले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात गुंडांनी अभूतपूर्व असा हिंसाचार घडवला. बुरखाधारी व्यक्तींनी हातात लाठ्या आणि लोकंडी सळ्या घेऊन दंगल घडवली. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (एम्स) उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना सोमवारी सकाळी रुग्णालयातून सोडण्यात आले. या दंगलखोर जमावाने विद्यापीठाच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान केले.
विद्यापीठ प्रशासनाच्या सुचनेवरून दिल्ली पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात संचलन केले. डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थीॅ परिषद यांनी या प्रकरणात एकमेकांवर आरोप केले आहेत. आमची चळवळ मोडून काढण्यासाठी काही संघवादी प्राध्यापक गेले चार पाचा दिवस हिंसाचाराला प्रोत्साहन देत होते. जेएनयु आणि दिल्ली पोलिसांकडे सुरक्षा मागणे चूक आहे का? असा सवालही घोष यांनी केला.