पुणे – पीएमपीच्या वाहकांनी प्रवाशांजवळ जाऊनच तिकीट द्यायचे आहे. बसथांबा आल्यावर प्रवाशांना ऐकायला जाईल, अशा आवाजात थांब्याचे नाव पुकारावे, अशा सक्तीच्या सूचना पीएमपी प्रशासनाकडून सर्व वाहकांना दिल्या आहेत. त्यामुळे जागेवर बसून तिकीट देणे किंवा बसथांब्याचे नाव न पुकारण्याच्या तक्रारी आल्या तर संबंधित वाहकावर कारवाई करण्यात येणार आहे.
तिकिटाचे कोण राहिले, चला तिकीट घ्या, असा आवाज प्रत्येक पीएमपी बसमध्ये ऐकायला मिळतो. मात्र, काही वाहक जागेवर बसूनच तिकीट देत असल्याचे दिसून येतात. शिवाय, तिकिटासाठी आवाज दिला जातो, तसा आवाज बसथांबा आल्यावर येत नाही. त्यामुळे गर्दीत किंवा नवख्या व्यक्तीला बसथांबा कोणता आला हे समजण्याआतच बस पुढे निघून गेलेली असते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.
पीएमपीमध्ये शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक यांना चालत्या बसमध्ये तिकीट घेताना अडचणी येतात. तर बसथांबा आल्यावर वाहक थांब्याची नावे पुकारत नाही, काही थांब्यांवर बस थांबतही नाही असा अनेक तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने गांभिर्याने या तक्रारींची दखल घेत सूचना जारी केल्या आहेत.