मुंबई -महाराष्ट्रातील सत्तेमुळे बळ मिळालेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपला जशास तसे उत्तर देण्याची रणनीती आखत आहे. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या नेत्यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले होते. आता घरवापसीसाठी तयार असलेल्या नेत्यांना स्वगृही आणून भाजपवर राजकीय पलटवार करण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज झाल्याचे संकेत मिळत आहेत.
कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांत सत्तांतर घडवून पुन्हा सत्ता मिळवण्यात भाजपला यश आले. भाजपकडून तसेच ऑपरेशन लोटस् महाराष्ट्रातही हाती घेतले जाऊ शकते, अशी चर्चा वारंवार होत असते. तशा राजकीय हालचाली करण्यापासून भाजपला रोखण्यासाठी आधीच चाल करण्याची खेळी राष्ट्रवादीकडून केली जाणार असल्याचे सूचित होत आहे. त्यातून राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीतील स्थान आणखी बळकट करण्याचे उद्दिष्टही राष्ट्रवादीला साध्य करायचे असल्याचे समजते.