जिरायती भागातील नागरिकांचा सवाल : पाऊस नगण्य, तरी नऊ गावांमध्ये टॅंकर केले बंद
बारामती – बारामती तालुक्याच्या जिरायती भागात अगदी नगण्य पाऊस झालेला आहे. मात्र, जुलै महिन्यात सरासरीच्या 165 टक्के पाऊस झाल्याचे प्रशासनाने कारण सांगून तालुक्यात सुरू असलेल्या 49 टॅंकरची संख्या 16 वर आणली आहे. तर जिरायती भागातील नऊ गावांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पाण्याचे टॅंकर बंद करण्यात आल्याने नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असून एसीमध्ये बसून आकडेवारी पाहण्यापेक्षा परिस्थिती काय आहे याची प्रत्यक्ष पाहणी पाहूनच निर्णय घ्या, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी देत “प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का’? असा सवाल उपस्थित केला आहे.
नीरा देवघर भाटघर, वीर धरणातून मोठ्याप्रमाणात विसर्ग झाल्याने नीरा नदीला महापूर आल्याने तालुक्यातील काही गावातील जनजीवन विस्कळीत झाले होते. हे जनजीवन गेल्या दोन दिवसांपासून पूर्वपदावर जरी येत असले तरी तालुक्याच्या जिरायती भागात नगण्य पाऊस झाल्याने अद्यापही तीव्र दुष्काळाच्या झळा सोसत असल्याने या परिसरातून टॅंकरची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. याबाबत मोढवे गावच्या सरपंच लतिका मोरे, उपसरपंच ऍड. राहूल बनकर, ग्रामपंचायत सदस्य हरीदास भगत, वर्षा बनकर, रंजना लकडे, मनिषा मोरे यांनी बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना टॅंकर त्वरीत सुरू करण्याबाबत मागणी अर्ज दाखल केला आहे.
चारा छावण्यांमध्येही पाण्याचा प्रश्न बिकट
बारामती तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पशुधन जगविण्यासाठी शासनाने काही संस्थांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची संख्या असून या छावण्यांना देखील पाणीटंचाई जाणवत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी संस्थानच्यावतीने देखील पाण्याच्या टॅंकरची मागणी होत आहे.
बारामती तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना सुमारे 49 टॅंकरद्वारे तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा केला जात होता मात्र, जुलै महिन्यात सरासरीच्या 165 टक्के पाऊस झाल्याने टॅंकरची संख्या कमी करण्यात आली गरजेनुसार सोळा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिरायती भागातील काही गावांमधून टॅंकरची मागणी होत आहे, त्या गावांना देखील टॅंकर सुरू करण्यात येणार आहे. पावसामुळे काही खासगी विहिरींना पाणी वाढ झाले आहे, अशा खासगी विहिरी देखील अधिग्रहण करून जिरायत भागातील गावांना पाणी पुरविले जाणार आहे.
– प्रमोद काळे, गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती