दिलीप वळसे पाटील यांची टीका
मंचर- सरकारच्या विरोधात भूमिका मांडल्यास चौकशीचे फेरे सुरू होतात. यामुळे देश हुकूमशाहीकडे चालला आहे का? अशी शंका येत आहे. राज्य सहकारी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांना कर्ज दिले. हा काय गुन्हा केला आहे का? पाऊस झाला नसल्यासमुळे गाळप कमी झाले. त्यामुळे कारखान्यांना तोटा झाला म्हणून त्याला गैरव्यवहार म्हणायचे का? असा सवाल उपस्थित करुन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मनमानी कारभारावर रविवारी टीका केली.
मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आंबेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा महाविजय निर्धार युवक मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रमेश खिलारी, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पक्ष सोडायला सत्ताधारी भाग पाडत आहेत.लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग क्षेत्रात मंदी आली आहे. चाकण, रांजणगाव, सणसवाडी, भोसरी परिसरात काम करणाऱ्या ग्रामीण युवकांची रोजीरोटी बंद झाली आहे. ही भाजप सरकारची करणी आहे.