मुंबई – भारताचे माजी कर्णधार व निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर टीका केली आहे. गांगुली स्वतःला सर्वज्ञानी समजतात का? त्यांनी आयपीएल स्पर्धेबाबत केलेली वक्तव्ये पाहिली की असेच वाटते, असे ताशेरेही वेंगसरकर यांनी लगावले आहेत.
आयपीएल तसेच देशांतर्गत स्पर्धांबाबतही गांगुली यांनी बरीच वक्तव्ये केली आहेत. देशांतर्गत स्पर्धांबाबत आक्षेप नाही. मात्र, आयपीएलबाबत त्यांनी सातत्याने केलेली वक्तव्ये टाळायला हवी होती. ते बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत, आयपीएलचे नव्हे. त्यांनी निदान पदाचा तरी मान ठेवायला हवा होता, असे वेंगसरकर यांनी म्हटले आहे.
आयपीएल कुठे, कधी होणार, त्याचबरोबर जेव्हा स्पर्धेच्या तारखा ठरवल्या जात होत्या, तेव्हा गांगुली यांनी काही मते व्यक्त केली. पण ही मते आयपीएलच्या अध्यक्षांनी करणे महत्त्वाचे ठरते, गांगुली यांनी याबाबत माहिती दिली याचे आश्चर्य वाटते. यातून गांगुली यांना काय सिद्ध करायचे आहे, बीसीसीआयमधील अन्य सदस्यांपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे, असे गांगुली यांना सांगायचे आहे का, असा सवालही त्यांनी केला.
क्रिकेटचा खेळ माजी क्रिकेटपटूंनीच चालवायला हवा, असे मी नेहमीच सांगत आलो आहे. मला गांगुलीकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण आतापर्यंत ज्या गोष्टी मी पाहिल्या आहेत, त्यामुळे माझे मन बदलायला लागले आहे.
तुम्ही जर पाहाल तर, निवड समिती किंवा बीसीसीआयच्या कोणत्या सदस्यांनी रोहित शर्माच्या दुखापतीबाबत भाष्य केले नव्हते. पण दुखापतीचे कारण देऊन रोहितची भारताच्या ऑस्ट्रेलिया संघासाठी निवड करण्यात आली नाही. पण गांगुली यांनी मात्र, रोहित जर फिट असेल तरच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेले जाईल, असे गांगुली यांनी म्हटले होते, याबाबत माझा आक्षेप नाही पण आयपीएलबाबत त्यांनी वक्तव्ये करू नयेत असे मला वाटते, असेही वेंगसरकर यांनी नमूद केले.