मुंबई – भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर लगेचच संघाला सराव करता येणार नसून त्यांची करोना चाचणी केली जाणार असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्यांना सरावाला परवानगी दिली जाणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने दिली आहे.
भारतीय संघातील खेळाडूंचा विलगीकरण कालावधी कमी राहण्यासाठी बीसीसीआयने केलेल्या प्रयत्नावर मंडळाने हा निर्णय घेतला आहे. खेळाडूंची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सराव करता येणार आहे.
येत्या गुरुवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल होत आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडू बायो बबलमध्ये दाखल होतील व त्यानंतरच ते सराव करतील. आयपीएल स्पर्धेसाठी तब्बल जवळपास दोन महिने भारतीय खेळाडू अमिरातीत होते. त्यामुळे त्यांची चाचणी केली जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय, 3 टी-20 तसेच 4 कसोटी सामन्यांची खेळवण्यात येणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग आहे. या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
27 हजार प्रेक्षकांना परवानगी
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत ऍडलेडच्या मैदानावर होत असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी मैदानाच्या प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के म्हणजेच 27 हजार प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहून सामना पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने दिली आहे.
करोनाच्या धोक्यामुळे मार्च महिन्यापासून स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. तसेच त्यानंतर ज्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नव्हती.