मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीकाकारांच्या निशाण्यावर राहिले आहेत. पालघर साधू हत्या प्रकरण, सुशांत मृत्यू प्रकरण, कंगना प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे व शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगना व एका माध्यम समूहाच्या संपादकांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
मात्र अशा वादळी टीकेनंतर देखील आक्रमकपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेने दिलेला प्रतिसाद मवाळ असल्याचं मत काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे. अशातच आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांची पत्रकार आशुतोष यांनी विशेष मुलाखत घेतली.
या मुलाखतीदरम्यान राऊत यांच्यासमोर त्यांनी, “एक काळ होता जेव्हा लोक म्हणायचे की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांविरोधात कुणी एक शब्द बोलून बाहेर पडू शकत नव्हता. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना धडा मिळाला. उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल एका टिव्हीचा संपादक मागील दोन महिन्यांपासून ज्या प्रकारची भाषा वापरत आहे, एक अभिनेत्री कंगना रणौत ज्या पद्धतीची भाषा बोलत आहे. तुम्हाला वाटत का शिवसेना कमजोर झाली आहे? ” असा प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, ‘जेव्हा वेळ येईल, तेव्हा सांगू. विसरलेलो नाही. आमचा अपमान विसरणार नाही. हा महाराष्ट्र आहे.’ असा इशारा दिला.
काय म्हणाले संजय राऊत?
“शिवसेना कुमकुवत झालेली नाही. शिवसेना सत्तेत आहे. आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. आमचे लोक खूप रागात आहेत. आम्ही आधीही सांगितलं की, जेव्हा विरोधी बाकांवर होतो, तेव्हा एका इशाऱ्यावर लोक रस्त्यावर उतरत होते. जे वाटेल ते आम्ही करायचो. माझ्यावर १४० पेक्षा जास्त खटले सुरू आहेत. आम्ही घाबरणारे लोक नाही. पुढेही घाबरणार नाही.
“सत्ता येते. सत्ता जाते. सत्ता घेऊन कुणीही येत नाही, आम्हीही राहणार नाही. सगळ्यांना जावं लागणार आहे. सत्ता सोडावी लागणार आहे. जे आमच्यावर भुकंत आहेत, त्यांनाही माहिती आहे. भीती तर त्यांच्या मनात आहे. ते फक्त वरून दाखवत आहेत. पण, जेव्हा वेळ येईल, तेव्हा सांगू. विसरलेलो नाही. आमचा अपमान विसरणार नाही. हा महाराष्ट्र आहे,”