पुणे -पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खेड तालुक्यातील चार जागा तांत्रिक दृष्ट्या योग्य नसल्याचा निर्वाळा एअरपोर्ट ऍथॉरिटीने दिल्याने विमानतळाने खेड तालुक्यातून गाशा गुंडाळला होता. त्यानंतर आता पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पुरंदर आणि बारामतीतील सुचवलेल्या सात जागांचा प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने केराची टोपली दाखवल्याने आमदार जगतापांच्या महत्त्वाकांक्षेला जबर धक्का बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, हे विमानतळ पुन्हा खेड तालुक्यात आणा अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे; मात्र एअरपोर्ट ऍथॉरिटीने खेडमधील जागा तांत्रिक दृष्ट्या योग्य नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर खेडचा पर्याय पुन्हा पटलावर येणे किती व्यवहार्य आहे, असा प्रश्न आता उपस्थितीत केला जात आहे.
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने नवीन जागेला साईट क्लिअरन्स म्हणजे जागा परवानगी नाकारली आहे. दरम्यान, तत्कालिन फडणवीस सरकारने पुरंदर येथील जागेची निवड अंतीम केली होती. त्याला संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली होती; मात्र आघाडी सरकार आल्यानंतर त्या जागेत बदल करण्यात आला. नवीन बदलांचा प्रस्ताव घेऊन आमदार संजय जगताप यांनी शरद पवार यांना बरोबर नेत संरक्षण मंत्र्यांना साकडे घालत तसा प्रस्ताव संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता; पण, संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारल्याने आमदार जगताप यांच्या विरोधकांना शह देण्याच्या राजकीय खेळीला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच विरोधामुळेच विमानतळ खेड तालुक्यातून गेल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आल्याने 2019च्या निवडणुकीत आढळराव पाटील यांचा खासदारकीचा चौकार हुकला. दरम्यान, जागेच्या प्रश्नावरून कायम चर्चेत असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली. त्यामुळे आता नव्याने जागेचा शोध घेताना पिंपरी-चिंचवडलगतच्या खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली असली तरी ती किती व्यवहार्य आहे यावर प्रश्न उपस्थितीत होत आहे.
पुरंदरमधील मंजूर गावांमधूनच पुन्हा “टेक ऑफ’?
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने आणि तत्कालीन पुरंदर-हवेलीचे आमदार तथा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पूर्वी अंतीम केलेल्या वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील अठ्ठावीसशे हेक्टर जमिनीवरील मंजूर विमानतळास अद्याप नकार देण्यात आला नसल्याने नवीन जागेच्या शोधापेक्षा याच जागांवर हे विमानतळ उभारले जाणार का याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
म्हणून राजकीय नेत्यांचा खेडसाठी आग्रह
पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्टयात हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे असल्याचे सांगितले. गेल्या 10 वर्षांपासून विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रातील तळेगाव-चाकण- रांजणगाव इंडस्ट्रिअल हब आणि पिंपरी-चिंचवडमधील रेसिडेन्सिअल कॉरिडॉरच्या दृष्टीने भविष्यातील 25 वर्षांचा विचार करता खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणे गरजेचे असल्याचे राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे.
खेडमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ माझ्यामुळे तालुक्याबाहेर गेले, हा जो आरोप माझ्यावर होत आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही. एअरपोर्ट ऍथॉरिटीने तसा निर्णय दिला आहे, त्यामुळे खेडमधून विमानतळ बाहेर गेले, ते जर पुन्हा खेडमध्ये आले तर त्याचे स्वागतच आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार