नवी दिल्ली – इराणचे सरंक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल आमीर हतामी काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. तब्बल 40 वर्षानंतर इराणचे संरक्षणमंत्री भारताच्या दौऱ्यावर आले होते. आमीर हतामी यांचा भारत दौरा अनेक अंगानी महत्वपूर्ण ठरला आहे. यामुळे भारत आणि इराणमधील संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे. हतामी बंगळूरुमध्ये झालेल्या एअरो-इंडिया 2021 मध्ये देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. इस्त्राईल आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला असताना आमीर हतानी यांनी भारताच दौरा केला.
भारत आणि इराणमध्ये चाबहार आणि झाहेदान रेल्वे लाईन प्रकल्प करार 2020 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी हा प्रकल्प चीनकडे जाईल अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होता. मात्र, हा प्रकल्प भारतासोबत करण्यात आला. मात्र, गेल्या काहीवर्षांमध्ये इराणची चीनशी जवळीक वाढल्याचं तज्ज्ञ सांगतात. आमीर हतामी यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना भारत आणि इराण यांच्यातील संबंध ऐतिहासिक राहिल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये सुरक्षेसंबंधी काही करार देखील झाले आहेत. भारत आणि इराणच्या सैन्याचे संयुक्त लष्करी सराव देखील यापूर्वी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे इराणशी संबंध बिघडत चालले आहेत. इराणने पाकिस्तानातील बलुचीस्तान भागात सर्जिकल स्ट्राईक केला होता. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधाविरोधात आणि पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी इराण भारताकडे मोठ्या आशेने पाहतोय. आमीर हतामी यांचा भारत दौरा अमेरिका, पाकिस्तान आणि चीनसाठी विचार करायला लावणार आहे.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सप्टेंबर 2020 मध्ये इराणच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी आमीर हतामी यांना एअरो इंडिया 2021 चे आमंत्रण दिले होते. पश्चिम आशियातील देशांमधील संतुलन ठेवण्यामध्ये भारताची नेहमीच महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आखाती देश आणि इस्त्राईल यांच्याशी संबंध चांगले ठेवताना भारताला इराणसोबतही चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे.
भारतात गेल्या काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील इस्त्रायली उच्चायुक्त कार्यालयाजवळ आयईडी ब्लास्ट झाला होता. भारतातील इस्त्रायली उच्चायुक्त रॉन माल्का यांनी त्याला दहशतवादी हल्ला म्हणत त्यामध्ये इराणचा कट असल्याचा संशय व्यक्त केला होता.