मुंबई – वादग्रस्त वक्तव्यांबाबत सातत्याने टीकेचे धनी बनलेले भारताचे माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी आता लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुलवर ताशेरे ओढले आहेत. वैयक्तिक कामगिरी तो चमकदार करत आहे. मात्र, त्याचे नेतृत्व अत्यंत कुचकामी ठरले आहे, त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची क्षमता असलेला लखनौ संघ बाहेर पडला, अशा शब्दांत मांजरेकर यांनी टीका केली आहे.
कोणत्याही संघाच्या कर्णधाराने संपूर्ण जबाबदारी स्वीकारायची असते. स्वतः पुढे येत सरस कामगिरी करत अन्य सहकारी खेळाडूंनाही प्रेरित करायचे असते. नेमके याच बाबतीत राहुल कमी पडला. त्याने संघाचा विचार करण्याऐवजी स्वतःच्या कामगिरीचा विचार जास्त केल्याचे दिसून आले. केवळ आयपीएलमधील संघाचे नेतृत्व नव्हे तर तो जेव्हा आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसला तेव्हाही त्याच्या नेतृत्वात काहीही चमक दिसली नाही. आयपीएल स्पर्धेत त्याने पदार्पण केल्यापासून आजवर त्याची वैयक्तिक कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वाबाबतची आकडेवारी पाहिली तर तो एक अत्यंत साधारण कर्णधार असल्याचे दिसते. त्याच्याकडे समोरच्या संघातील खेळाडूंविरुद्ध कोणतीही योजना तसेच त्याचे पर्यायही तयार नसतात. मैदानात उतरल्यापासूनच त्याची देहबोली धूर्त कर्णधारासारखी दिसत नाही, असेही मांजरेकर म्हणाले.
आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक मोसमात त्याने भरपूर धावा केल्या आहेत. यंदाच्या मोसमातही त्याने 15 डावांत 50 पेक्षा जास्त सरासरीने 616 धावा केल्या आहेत. पण प्लेऑफमध्ये मात्र त्याचा संघ अपयशी ठरला व त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. केवळ अन्य खेळाडूंवर किंवा सपोर्ट स्टाफवर पराभवाची जबाबदारी ढकलण्यापेक्षा राहुलने ही जबाबदारी स्वीकारायला हवी. गेल्या मोसमात पंजाब किंग्जचे नेतृत्व करतानाही राहुल असाच वैयक्तिक कामगिरीसाठीच खेळताना दिसला. तेव्हाही त्याच्या धावा झाल्या. मात्र, पंजाब संघाला यश आले नाही.
कर्णधारपदासाठी तो योग्य पर्याय नव्हताच हे मी स्पर्धेच्या सुरुवातीलाही बोललो होतो. यंदाच्या मोसमात लखनौचा संघ पहिल्यांदाच सहभागी झाला होता. अशा वेळी सगळे खेळाडू एकत्र येत सपोर्ट स्टाफच्या सहकार्याने आणखी जास्त भक्कम संघबांधणी करता आली असती. राहुलने यासाठी पुढाकार घेतला असता तर आज त्यांचा संघ अंतिम फेरीत खेळताना दिसला असता, असेही मांजरेकर म्हणाले.