मुंबई – राजस्थान रॉयल्सकडून यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणारा भारतीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने या स्पर्धेच्या इतिहासात दीडशे बळींचा पल्ला पार केला. इतकेच नव्हे तर त्याने स्पर्धेतील सर्वात किफायतशीर गोलंदाज बनण्याचीही कामगिरी केली आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये सात किंवा त्यापेक्षा कमी सरासरी राखणारा गोलंदाज खूपच महत्त्वाचा मानला जातो. रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदारला बाद करत अश्विनने हा पल्ला गाठला. या स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा अश्विन आठवा गोलंदाज ठरला आहे.
त्याने त्याच्या एकूण बळींची संख्या 152 केली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतलेल्या गोलंदाजांमध्ये तो सहाव्या स्थानी आला आहे. अश्विनने आतापर्यंत आयपीएलमध्ये 175 सामने खेळताना 6.93 च्या सरासरीने तसेच 28.04 अशा गोलंदाजी सरासरीने 152 बळी घेतले आहेत.