शारजा – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू आणि इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एलिमिनेटर गटाची आज होणारी लढत अंतिम फेरीत पात्र होण्याची समान संधी आहे.
हे दोन्ही संघ समान पातळीवर समतोल असून यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपल्या बेभरवशी फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. या स्पर्धेत साखळी फेरीत या दोन्ही संघांना सातत्याने सलामी चांगली देता आलेली नाही. तसेच त्यांना मधल्या फळीतही सातत्यपूर्ण फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलेले नाही.
बेंगळुरूबाबत बोलायचे तर त्यांचा ग्लेन मॅक्सवेल अन्य फलंदाजांपेक्षा जास्त सातत्यपूर्ण फलंदाजी करत आहे. कोहलीदेखील सलामीला फलंदाजी करत असला तरीही त्याला देवदत्त पडीक्कलसह संघाला शतकी सलामी देता आलेली नाही. या स्पर्धेच्या एलिमिनेटर गटातून पुढे वाटचाल करायची असेल तर त्यांनाच सुरुवातीपासून कोलकाताच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखावे लागेल.
मिस्टर 360 अशी ओळख असलेला एबी डीविलियर्सही आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यापेक्षा नवोदित श्रीकर भरतने अखेरच्या साखळी सामन्यात वादळी फलंदाजी करताना नाबाद 78 धावांची खेळी केल्यामुळे बेंगळुरूला मधल्या फळीत एक आश्वासक फलंदाज गवसला आहे असे म्हणायला हरकत नाही.
त्यामानाने बेंगळुरूची गोलंदाजी काही प्रमाणात कोलकातापेक्षा जास्त सरस ठरली नसली तरीही हर्षल पटेल, डॅनियल ख्रिस्तियन यांनीच प्रमुख भार वाहिला आहे. त्यांच्या जोडीला आता महंमद सिराज, यजुवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेल यांना कोलकाताच्या प्रमुख फलंदाजांवर अंकूश राखण्याचे काम करावे लागणार आहे.
दुसरीकडे कोलकाताबाबत सांगायचे तर त्यांच्याकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत, पण तरीही कर्णधार मॉर्गनचे अपयश त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्याच्यासह शुभमन गिलही त्याच्या गुणवत्तेनुसार खेळ करताना दिसलेला नाही. नवोदित व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितिश राणा व माजी कर्णधार दिनेश कार्तिक यांच्यावरच त्यांची फलंदाजी अवलंबून राहणार आहे.
गोलंदाजी मात्र, बेंगळुरूपेक्षाही जास्त सरस आहे. नवोदित शिवम मावी आणि लॉकी फर्ग्युसन यांच्यावर वेगवान गोलंदाजीचा भार असून मावीने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चार गडी बाद करताना त्याने जी अचुकता दाखवली त्यात आता बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सातत्य राखावे लागणार आहे. तसेच मिस्ट्री स्पीन गोलंदाज वरुण चक्रवर्ती व सुनील नरेन यांच्या गोलंदाजीसमोर कोहली आणि कंपनी कशी फलंदाजी करते हे पाहणे रंगतदार ठरणार आहे.
एबीकडून वादळाची अपेक्षा…
बेंगळुरु संघाच्या जवळपास प्रत्येक सामन्यात जेव्हा एबी डीविलियर्स फलंदाजीला येत होता तेव्हा समालोचकही त्याच्या फलंदाजीत सातत्य नसल्याचे सांगत होते. मात्र, केवळ विक्रमादित्य सुनील गावसकरच ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे मत व्यक्त करताना दिसले. गावसकर यांच्या वक्तव्याला प्रत्यक्ष सिद्ध करण्यात एबी डीविलियर्स यशस्वी ठरला तर त्याच्या फलंदाजीतून निर्माण होणाऱ्या वादळात कोलकाता भुईसपाट होईल. मात्र, त्यासाठी बेंगळुरूला डावाची सुरुवात चांगली करावी लागेल व त्याची जबाबदारी कर्णधार कोहली, पडीक्कल व ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर राहणार आहे.