मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील सर्व लढती महाराष्ट्रातच होणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. मुंबईतील ब्रेबॉन, वानखेडे व नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम, तर पुण्यातील गहुंजे या तीनच मैदानांवर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
देशात पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णवाढीमुळे स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांत तसेच विविध शहरांत करोनाचा धोका वाढत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही हेच चित्र आहे. जर येत्या काही दिवसांत हा धोका कमी झाला नाही, तर यंदाची स्पर्धा जास्तीत जास्त चार केंद्रांवर घेण्याची बीसीसीआयची योजना आहे.
मुंबईचं वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियम या चार मैदानांवर ही स्पर्धा होण्याचे संकेत मिळत आहेत.
या संदर्भात पाच जानेवारीला बीसीसीआयचे व आयपीएलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हेमांग अमीन यांनी मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांची भेट घेतली. काही दिवसांनी अमीन आणि पाटील यांनी संघटनेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बीसीसीआयच्या प्रस्तावाला शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या दहा दिवसांत बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट संघटना या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आवश्यक परवानग्या मिळवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल.
नियमांची होणार काटेकोर अंमलबजावणी
करोनाचा धोका वाढत असल्याने यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रेक्षकांना मैदानावर परवानगी नसेल. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांची वेळोवेळी चाचणी केली जाईल.