दुबई – कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायडू व फाफ डुप्लेसी यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज उपयुक्त कामगिरी करू न शकल्यामुळे आजच्या सामन्यातही चेन्नई सुपर किंग्जला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात सरस कामगिरी करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
चेन्नई संघाने यंदाच्या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा पराभव करत थाटात सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर त्यांना सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यातच भरात असलेला रायडू दुखापतीने त्रस्त झाल्याने त्यांची फलंदाजी अत्यंत कमकुवत बनली आहे.
डुप्लेसी व धोनी यांनाच फलंदाजीचा मुख्य भार वाहावा लागत आहे. त्यातही धोनी खूपच तळात फलंदाजीला येत असल्याने धावांचा पाठलाग करताना त्यांची सातत्याने दमछाक होत आहे. पंजाबवर दडपण आणायचे असेल तर सलामीचे फलंदाज मुरली विजय व शेन वॉटसन यांना आक्रमक सुरुवात द्यावी लागणार आहे. सध्या या दोन्ही फलंदाजांचा सूर हरवलेला असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने धोनी संघात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे.
ब्राव्होकडे लक्ष…
चेन्नई संघाला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी ठरलेला एक अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असलेला ड्वेन ब्राव्हो या सामन्यात कशी कामगिरी करतो यावरच संघाचे यश अवलंबून आहे.
या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असल्याचे यापूर्वी झालेल्या काही सामन्यांतून सिद्ध झाल्याने मिचेल सॅन्टनरचा संघात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या जोडीला रवींद्र जडेजाला देखील आपल्या दर्जानुसार कामगिरी करावी लागणार आहे. यापूर्वीच्या सामन्यात जडेजाची जादू चाललेली नाही. त्याच्याकडून गोलंदाजी तर सुमार होत आहे पण फलंदाजीतही त्याला फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही.
पंजाबविरुद्ध जर विजय मिळवायचा असेल तर चेन्नईच्या गोलंदाजांना राहुल, आग्रवाल, मॅक्सवेल व पुरन यांना लवकर बाद करावे लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत राहुल व मयंकने मोठी सलामी दिल्याने त्यांचे विजय सोपे बनले होते. आजही या जोडीकडून अव्वल सलामीची त्यांना गरज आहे.
दुसरीकडे पंजाबची स्थिती भक्कम आहे. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण सध्या सर्व संघात सरस होत आहे. त्यांच्या फलंदाजांनी तर सातत्याने समोरच्या संघावर दडपण राखले आहे. खुद्द कर्णधार लोकेश राहुल, मयंक आग्रवाल, निकोलस पुरन, ग्लेन मॅक्सवेल, कृष्णाप्पा गौतम यांनी उपयुक्त फलंदाजी केल्याने प्रत्येक सामन्यात त्यांनी मोठी धावसंख्या उभारली आहे.
महंमद शमी, गौतम यांनी यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण गोलंदाजी केली आहे. त्यातही शमीने महत्त्वाच्या क्षणी बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली आहे. मात्र, शेल्डन कोट्रेलचे अपयश हीच त्यांच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे.