मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या करोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या उर्वरित सामन्यांचे आयोजनही भारतातच होणार असून हे सामने सप्टेंबरमध्ये होतील, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
आयपीएलचा 14 वा मोसम करोनाच्या धोक्यामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये आयपीएलचे आयोजन पुन्हा केले जाईल, असे सांगितले जात आहे. 2021 टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी सप्टेंबरमध्ये यंदाच्या आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी सर्व संघ भारतात येणार आहेत. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या खेळाडूंना वेळेआधी बोलावून बाकी राहिलेल्या सामन्यांचे आयोजन करेल, असे सांगितले जात आहे.
देशात सप्टेंबर महिन्यात देशातील करोनाची स्थिती नियंत्रणात असेल तर आयपीएलच्या बाकी सामन्यांचे आयोजन भारतात होऊ शकते. जर परदेशी खेळाडू उपलब्ध होत असतील आणि करोनाची स्थिती नियंत्रणात आली तर निश्चितपणे टी-20 विश्वकरंडकापूर्वी आयपीएलचे सामने खेळवण्यात येतील, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 29 सामने पार झाले होते. त्यानंतर काही खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.