नवी दिल्ली -भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी करोनावरील लसीचा पहिला डोस मायदेशात घेतला. आता दुसरा डोस हे सगळे क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये घेणार आहेत. इंग्लंड दौरा लक्षात घेत भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे.
दरम्यान, कोविशिल्ड ऑक्सफोर्डची लस असून भारतात या लसीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. इंग्लंडमध्ये ऍस्ट्रेझेन्का लसीचा डोस दिला जात असून ही लसही ऑक्सफर्डनेच तयार केली आहे. तसेच ती कोविशिल्डसारखीच असल्याने बीसीसीआयनेही यावर हरकत घेतलेली नाही.
करोनाच्या धोक्याचे संकट असूनही भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मैदानावर उतरण्यासाठी तयार आहे. त्यामुळेच आता कोहलीच्या संघाने अर्धी लढाई मायदेशात लढली असून, अर्धी लढाई इंग्लंडमध्ये लढणार आहे.
भारतीय संघ 18 ते 22 जून या कालावधीपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. तसेच चार ऑगस्टपासून 14 सप्टेंबरपर्यंत इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. 2 जूनला भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर संघ 7 दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार आहे.
बीसीसीआयने जूनमध्ये खेळवण्यात येणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. हार्दिक पंड्या आणि पृथ्वी शॉचाही समावेश करण्यात आला आहे. संघात रोहित शर्मा, शुभमन गिल, लोकेश राहुल आणि मयंक आग्रवालचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ ः
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक आग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, महंमद शमी, महंमद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.