IPL 2024: आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्समधील रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्यानंतर ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. यावरून रोहितच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. मुंबई इंडियन्स संघाचे कोच मार्क बाऊचर यांनी नेतृत्व रचनेतील या बदलावर स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर रोहितची पत्नी रितिकाने यावर संताप व्यक्त केला आहे. रितिकाने यातील बऱ्याच गोष्टी चुकीच्या असल्याचे म्हंटले आहे.
मार्क बाऊचर काय म्हणाला ?
“क्रिकेटच्या अखेरच्या टप्प्यात रोहित शर्माने मोकळेपणे खेळावे. तो भारताचे नेतृत्व करत आहे. अशा स्थितीत आयपीएलमध्ये खेळताना त्याच्यावरील कर्णधारपदाचे दडपण कमी होईल. त्यामुळे त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होताना दिसेल. मागील काही हंगामापासून रोहित शर्मा फलंदाज म्हणून फ्लॉप होत आहे. त्यामुळे आम्ही खूप विचार करुन हार्दिक पांड्याला कर्णधार केले,” असे मुंबई इंडियन्सचा मुख्य कोच मार्क बाऊचर याने मुलाखतीत सांगितले.
पुढे मार्क बाउचर म्हणाला की, “करिअरच्या अखेरच्या टप्प्यात रोहित शर्मावरील दडपण कमी व्हावे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मार्क बाऊचर याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. हार्दिक पांड्या मुंबईचाच आहे. तो दुसऱ्या संघात गेला, तिकडे त्याने पहिल्याच हंगामात चषकाला गवसणी घातली. दुसऱ्या वर्षी उपविजेता राहिला. हार्दिक पांड्याचे नेतृत्व शानदार आहे. भारतातील बऱ्याच लोकांना हे समजत नाही, लोक खूप भावूक होतात, पण भावनांना दूर ठेवा.”
दरम्यान, हार्दिक पांड्याने गुजरातला पदार्पणातच चषक जिंकून दिला. त्यानंतर दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद मिळवून दिले. आयपीएल 2024 आधी मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढत हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवले. मुंबईसाठी हार्दिक पांड्या सहा वर्ष खेळल्यानंतर त्याने गुजरातची वाट धरली. पण आता तो मुंबईच्या ताफ्यात परतला असून त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी पार पडणार आहे.