IPL 2024,Virat Kohli , T20 cricket – मला माहित आहे जेव्हाही टी-२० क्रिकेटची चर्चा होते तेव्हा माझे नाव आजकाल जगभरात टी-२० चा प्रचार करण्यासाठी वापरले जाते. मला असे वाटते की माझ्याकडे ते कौशल्य अजूनही आहे. काही दिवसांपूर्वीच असे सांगितले जात होते की, जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी विराटच्या भारतीय संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह आहे. जर त्याची आयपीएल मध्ये चांगली कामगिरी राहिली, तर त्याचा या स्पर्धेसाठी विचार केला जाईल, असे म्हटले जात आहे. अशाच काही टीकाकारांचा कोहलीने स्पष्टपणे समाचार घेतला आहे.
काही लोक स्वतःच काहीतरी ठरवतात व त्यांना बातम्यांचे स्वरुप देण्याचे काम काही माध्यमे करतात. मी त्याकडे लक्ष देत नाही, उलट प्रत्यक्ष मैदानावर सरस कामगिरी करुनच अशा लोकांना मी कामगिरीने उत्तर देतो, असेही कोहली म्हणाला.
आयपीएल स्पर्धेतील सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जविरुद्ध ४ गडी राखून थरारक विजय मिळवला. बंगळुरूचा हा या मोसमातील पहिलाच विजय आहे. या विजयात कोहलीने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
याबरोबरच त्याला आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा नावावर असलेल्या खेळाडूला दिली जाणारी ऑरेंज कॅपही त्याला देण्यात आली. यावेळी बोलताना विराटने त्याच्या टी२० क्रिकेट खेळण्यावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिले आहे. सामन्यानंतर विराट म्हणाला, ‘खुप उत्साही आत्ताच होऊ नका, कारण फक्त दोनच सामने झालेत. मला माहित आहे ऑरेंज कॅप मिळवण्याचे काय महत्त्व आहे. लोक खेळाबद्दल खूप चर्चा करतात. मात्र दिवसाच्या शेवटी तुम्ही यश, आकडेवारी, विक्रम यांबद्दल बोलत नाही, तर तुम्ही तयार केलेल्या आठवणींबद्दलच चर्चा करता. असे राहुल द्रविड म्हणतो. मैत्री, प्रेम, कौतुक, पाठिंबा हेच महत्त्वाचे आहे आणि जे तुम्ही विसरत नाही, असेही कोहलीने नमुद केले. विराट म्हणाला, टी-२० क्रिकेटमध्ये मी सलामीला फलंदाजी करतो. त्यामुळे मी आक्रमक सुरुवात देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, जेव्हा विकेट्स जातात, तेव्हा परिस्थितीनुसार खेळावे लागते.
खेळपट्टी नेहमीप्रमाणे फारशी पाटा नव्हती. अक्रॉस द लाईन जाऊन चेंडू फटकावता येत नव्हता. सामना संपवू शकलो नाही, याबद्दल निराश आहे, पण सुरुवात चांगली राहिली. जर गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असतील, तर तुम्हाला संयमी राहुन लय मिळवावी लागते, असे सांगताना कोहलीने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.