मुंबई – करोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (BCCI)मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. या स्पर्धेसाठी यूएई, इंग्लंड आणि श्रीलंका हे तीन प्रस्ताव होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज विशेष कार्यकारिणीचे आयोजन केले होते. या बैठकीत भारतातील करोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आयपीएलचे 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच 2020मध्य संपूर्ण आयपीएल यूएईमध्येच खेळविण्यात आले होते. यंदा मात्र आयपीएलचे सामने भारतात खेळवण्यात आले. मात्र, करोनाची दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती.
आयपीएल स्पर्धेला 19 किंवा 2 सप्टेंबर रोजी सुरुवात होऊ शकते. चार क्वालिफायर, सात डबल हेडर (एकाच दिवशी दोन मॅच) आणि दहा सिंगल हेडर (एकाच दिवशी एक मॅच) असे उर्वरित आयपीएल स्पर्धेचे स्वरूप असेल. आयपीएल स्पर्धेची सुरुवात वीकेंडला होईल आणि फायनल देखील वीकेंडला होण्याची शक्यता आहे. अबूधाबी, दुबई, शारजाह या तीन ठिकाणी हे सामने होतील, अशी माहिती आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर विशेष विमानाने इंग्लंड दौऱ्यावर गेलेला संघ थेट यूएईमध्ये दाखल होणार आहे.
टी-20 विश्वचषकाचं काय?
यंदाचा टी-20 विश्वचषक भारतात आयोजित करण्याचे नियोजन आहे. मात्र भारतात वाढत्या करोना संकटामुळे विश्वचषक भारतात घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबतचा निर्णय करण्यासाठी 1 जून रोजी बैठक होणार आहे.
त्या बैठकीतच विश्वचषकाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. विश्वचषक भारतात घेण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. परंतु भारतामधील करोनास्थिती आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.