मुंबई – देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीत आठ लाख 50 हजार नागरिक राहतात. प्रति चौरस किमीमध्ये तीन लाख 54 हजार 167 इतकी लोकसंख्येची घनता असणाऱ्या या भागात करोनाच्या दुसऱ्या लाटेत फार जणांना संसर्ग झाला नाही. कारण येथील रहिवाशांमध्ये नैसर्गिकपणे झालेल्या संसर्गामुळे मोठ्या संख्येने प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार झाली होती, असे संशोधन युरोपियन जर्नल ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्समध्ये शनिवारी प्रकाशित झाले आहे.
धारावीमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात प्रति दहा लाख लोकांमागे केवळ सात बाधीत निघाले होते. त्यावेळी महाराष्ट्रात प्रती दहा लाख नागरिकांमागे 307 तर भारतात 257 असे प्रमाण होते. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला होता. औषधे आणि रुग्णालयातील बेडची कमतरता कटाक्षाने जाणवत होती.
धारावीमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात प्रति दहा लाख नागरिकांमागे 48 बाधित एवढे करोना बाधित आढळले होते. काही दिवस हे प्रमाण 80 इतके अधिक झाले होते. त्यावेळी देशातील प्रमाण प्रति दहा लाख एक ते तीन एवढेच होते.
धारावीत सेरोपॉझिटिव्हिटीचे प्रमाण खूप जास्त आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात हे प्रमाण 57 टक्के होते. ते ऑक्टोबर महिन्यात 45 टक्क्यांएवढे कमी झाले. त्यामुळे प्रतिपिंडाचे प्रमाण कमी होत असल्याची भीती संशोधकांना वाटत होती.
कफपरेड झोपडपट्टीत ऑक्टोबर 2020 मध्ये केलेल्या सेरोसर्वेक्षणात प्रतिपिंडे 75 टक्के नागरिकांमध्ये आढळून आली. त्यामुळे त्यावेळी धारावीत 70 ते 80 टक्के नागरिकांचा सेरोपॉझिटिव्हिटी असावी. त्यातून तेथे सामूहिक प्रतिकारशक्ती तयार झाली असावी, अशी शक्यता या संशोधनात व्यक्त करण्यात आली.
हे संशोधन जपानमधील फूड अँड एनर्जी सेक्युरिटी सेंटर आणि दिल्लीस्थित व डॉ. दीपाली भारद्वाज यांनी केले.