कोलकाता – पंतप्रधान मोदींना अर्धा तास तिष्टत ठेवल्याच्या कारणावरून केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या विरोधात ज्या कुरघोड्या सुरू केल्या आहेत. त्याला ममतांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्या बैठकीला त्यांनी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनाही मुद्दाम पाचारण केले. राज्यपालांनाही त्यांनी या बैठकीसाठी पाचारण केले होते.
पंतप्रधान अन्य राज्यांमध्ये जेव्हा गेले त्यावेळी त्यांनी असा प्रकार केला नव्हता. गुजरात आणि ओडिशाच्या दौऱ्यात त्यांनी विरोधी पक्षनेते किंवा राज्यपालांना बैठकीला न बोलावता केवळ मुख्यमंत्र्यांशीच चर्चा केली होती. येथे मात्र त्यांनी राजकारण करून मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला.
मोदींना आपण तिष्टत ठेवले हा आरोप फेटाळून लावताना त्यांनी म्हटले आहे की, विमानतळाच्या टर्म्याकवर त्यांनीच मला 20 मिनिटे तिष्टत ठेवले होते, असा आरोपही त्यांनी केला. मोदींच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाची आपल्याला आयत्यावेळी कल्पना दिली गेली. त्याच्या आधी माझा वादळग्रस्त भागाचा दौरा ठरला होता.
पण तरीही आपण मोदींच्या भेटीला गेलो आणि त्यांना नुकसानीबाबत निवेदन दिले. त्यांची अनुमती मागूनच आपण बैठकीतून नियोजित दौऱ्यासाठी बाहेर पडलो असेही ममतांनी स्पष्ट केले. राज्यांच्या मुख्य सचिवांना दिल्लीत बोलावण्याचा निर्णयही मला अपमानित करण्याचाच प्रकार आहे. त्यांनी तो निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
राज्याचे मुख्य सचिव हे मेहनती आहेत त्यांच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये, अशी मागणीही त्यांनी केली. बंगालच्या हितासाठी मोदींच्या पायाही पडायला आपण तयार आहोत पण त्यांनी अशा प्रकारच्या कुरघोड्या करून येथील जनतेचा सूड उगवू नये.
बंगाल निवडणुकीत झालेला नामुष्कीजनक पराभव त्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. पंतप्रधानांच्या बैठकीबाबत ज्या बातम्या प्रसारीत झाल्या आहेत त्या एकतर्फी आणि बदनामीकारक आहेत, असेही ममतांनी म्हटले आहे.