मुंबई – मुंबईतील जंबो कोविड सुविधेच्या कामात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सध्या ईडीमार्फत ठाकरे गटाशी संबंधीतांवर छापे टाकले जात आहेत. त्यावर जोरदार आक्षेप नोंदवताना उद्धव ठाकरे यांनी पीएम केअर फंडाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी भाजपची सत्ता असलेल्या नागपूर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या महापालिकांच्या तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील सरकारच्या कोविड काळातील कामकाजाच्याही चौकशीची मागणी केली आहे.
पीएम केअर म्हणजेच पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत निधी 2020 मध्ये सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून स्थापन करण्यात आला होता. याचा उद्देश प्रामुख्याने कोविड आजाराशी संबंधित संकटांना तोंड देण्यासाठी एक समर्पित राष्ट्रीय निधी उभारणे हा होता. पण त्या निधीत जमा झालेल्या अब्जावधी रूपयांच्या रकमेविषयी कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. पंतप्रधान मोदी या निधीचे अध्यक्ष आहेत. हा निधी कॅग किंवा माहिती अधिकाराच्याही कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. त्याविषयी देशभर मोठाच गदारोळ उडाला होता. आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा तो विषय उपस्थित करीत भाजपवर पलटवार केला आहे.
पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे यांनी कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आव्हान राज्य सरकारला दिले. ते म्हणाले की, महामारी कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्वात होता. पण कोविड सारख्या महाभयंकर महामारीच्या काळात नियमांच्या बाहेर जाऊन अडचणीत आलेल्या नागरीकांना मदत करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे होते असेही समर्थन केले. ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. आणि जेव्हा तुम्हाला चौकशी करायची असेल, तेव्हा तुम्ही ठाणे महापालिका, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि नागपूर नागरी महापालिकांचीही या काळातील गैरव्यवहारांची चौकशी करा.
पीएम केअर फंडाचीही चौकशी करा. पीएम केअर फंड कोणत्याही तपासाच्या कक्षेत येत नाही. लाखो आणि कोट्यवधी रुपये जमा झाले. त्यातून पुरवण्यात आलेल्या अनेक व्हेंटिलेटरमध्ये बिघाड झाला. आम्ही त्याचीही चौकशी करू, असे ठाकरे म्हणाले.