मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मतदार संघात म्हणजेच नागपुरात टाटा उद्योग समुहाकडून अधिक गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पायाभूत सुविधा, जमिनीची उपलब्धता आणि कनेक्टिव्हिटी या नागपुरात सोयीच्या बाबी आहेत त्याचा टाटा उद्योग समुहाने उचित लाभ घ्यावा असे आवाहनही गडकरी यांनी या समुहाला केले आहे.
7 ऑक्टोबर रोजी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना लिहिलेल्या पत्रात,गडकरी यांनी म्हटले आहे की, स्टील, वाहन, ग्राहक उत्पादने, आयटी सेवा आणि विमान वाहतूक यासारख्या व्यवसायात गुंतलेल्या टाटा समूहातील कंपन्या नागपुरात गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडू शकतात. अलिकडेच टाटा समुहाचा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेण्यात आला आहे. त्यावरून राज्य सरकारवर चौफेर टीका होत असतानाच गडकरी यांनी लिहीलेल्या या पत्राला महत्व दिले जात आहे.
पत्रात गडकरी यांनी म्हटले आहे की, नागपूर (मिहान) एसईझेड आणि नॉन-सेझ क्षेत्रामध्ये मल्टी-मॉडल आंतरराष्ट्रीय हब विमानतळामध्ये 3,000 एकरपेक्षा जास्त जमीन उपलब्ध आहे.टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, व्होल्टास, टायटन इंडस्ट्रीज, बिग बास्केट सारख्या टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्या सहा राज्यांतील 350 जिल्ह्यांशी रात्रभर कनेक्टिव्हिटी सुविधा, जमिनीचे कमी दर, मनुष्यबळ आणि गोदामांसारख्या नागपूरच्या सामर्थ्याचा लाभ घेऊ शकतात.