गेली अनेक वर्ष सातत्याने महाराष्ट्रातील महिला खेळाडूंची विविध खेळातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. राष्ट्रकुलच नव्हे तर इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांचा पदक विजेत्यांमध्ये सहभाग होता. त्याच बरोबर आतापर्यंत झालेल्या चारही खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातील महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत अशी अनेक नावे घेता येतील ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नव्हे तर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.आज नेमबाजीत भारतीय महिलांचे जे वर्चस्व सिद्ध केले आहे त्यात या महिला खेळाडूंचे मोठे योगदान आहे.
२०१५ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही महाराष्ट्रातील महिलांचा पदकविजेत्यांमध्ये सहभाग होता यांतील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा मान देखील महिला जलतरणपटूने पटकाविला होता यांत जलतरण, नेमबाजी, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मैदानी स्पर्धा तसेच प्रामुख्याने आपल्या देशी खेळ असलेल्या कबड्डी व खो खो खेळात पदके मिळवली आहेत. त्याचे सर्व श्रेय महिलांना द्यावे लागेल.
परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव ठोंबरे या छोट्या गावात राहून शेती करणारी ज्योती गवतेने नुकतीच ३५ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ४२.१९५ किमी अंतराची शर्यत ३ तास ६ मिनीटे व ०२ सेकंद या वेळेत जिंकली. आतापर्यंत तीने अनेक शर्यतीत भाग घेऊन मिळालेल्या पैशातून जमीन खरेदी केली आहे. तिने अलाहाबाद मॅरेथॉन २०१३ ते २०१८ अशी सलग सहा वर्ष, तर हैदराबाद मॅरेथॉन तीन वेळेस जिंकली आहे. आतापर्यंत ३६ हून अधिक मॅरेथॉन स्पर्धेत तीने भाग घेतला आहे. बांगला देश येथील मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक तर नेपाळमधील दक्षिण आशियायी स्पर्धेतही ती सहभागी झाली होती.
अर्जुन पुरस्कार विजेती व सावरपाडा एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या कविता राऊतने राष्ट्रकुल क्रीडा व आशियायी स्पर्धेत अव्वल दर्जाचे यश मिळवले आहे. जागतिक स्तरावर भारताचा झेंडा रोवणा-या व नाशिक येथील सावरपाडा या छोट्या गावातील कविता राऊत या धावपटूने आशियायी स्पर्धेत रौप्यपदक मिळवून देशाची मान उंचावली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रकुल आणि आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाऱ्या कविताचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय आहे.
मानदेशी एक्स्प्रेस या नावाने ओळखली जाणारी सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील ललिता बाबर हिने तीन वेळेस मुबंई मॅरेथॉन जिंकली आहे. तसेच २०१५ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तिने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.
भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार सारिका काळे या उस्मानाबाद येथील रूईभर या छोट्या गावातील खेळाडूचा प्रवासही थक्क करणारा आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, वडील अपंग, आई व आजीच्या अथक मेहनतीने सारिकाने भारतीय खो खो संघाचे कर्णधारपद मिळवले. तिसऱ्या आशियायी स्पर्धेत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून देताना ‘सर्वोत्कृष्ट खेळाडूचा़ बहुमान मिळविला. त्यानंतर ती शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली.तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम मानला जाणारा अर्जुन पुरस्कार पटकावणारी सारिका ही मराठवाड्यातील पहिली महिला क्रीडापटू असून ती सध्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर कार्यरत आहे.
सांगली जिल्ह्य़ातील स्मृती मंधाना मार्च महिन्यात होणा-या न्यूझीलंड क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सलामीची फलंदाज म्हणून सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ने तिचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव केला आहे.
२०१८ मध्ये इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत कोल्हापूर च्या राही सरनोबत नी महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल मध्ये सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवला. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिलीच महिला ठरली.
पुण्यातील अवंतिका नराळेने २०१९ मध्ये हाँगकाँग येथे झालेल्या तिस-या युवा (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना ‘वेगवान धावपटू’ चा मान मिळवला होता तिने नुकत्याच झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत ब्रॉझपदकही मिळवले आहे. पुण्याच्या युगा बिरनाळेने जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
याशिवाय अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील महिलांची कामगिरी दखल घेण्याजोगी राहिली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकायचे तर खेळाडूला जो संघर्ष करावा लागतो तो शब्दात मांडता येणार नाही. तरीही अनेक अडचणींवर मात करून क्रीडा क्षेत्राकडे वळणा-या किंवा या क्षेत्रात करिअर बनवू इच्छीणा-या महिलांच्या संख्येत भर पडत आहे. एकप्रकारे क्रीडाक्षेत्रातील महिलांनी मैदान गाजवले आहे. खेळातही महिला किती सक्षम आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे.पण या मुद्दय़ाकडे गंभीर दखल घ्यायला हवी तेवढी घेतली जात नाही.
आजही मुलींना शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर खेळताना अनेक अडचणी येतात. महाविद्यालयीन जीवनात क्रीडा क्षेत्रातील मुलींची संख्या कमी होऊ लागते. उच्च शिक्षण घेणे व नोकरी मिळवणे याकडे लक्ष देताना क्रीडाक्षेत्रातील करिअर मर्यादा येऊ लागतात.अर्थात हे फक्त मुलींच्या बाबतीत नव्हे तर मुलांच्या बाबतीत ही घडू शकते याचे मुख्य कारण आपण अजूनही क्रीडाक्षेत्रातील करिअरला प्राधान्य देत नाही. आपल्याकडे तशी मानसिकताही दिसत नाही. महिला देखील शिक्षण व नोकरीला प्राधान्य देताना क्रीडाक्षेत्राच्या करिअरवर पाणी सोडतात. भारतीय कौटुंबिक व्यवस्था, सामाजिक बंधने, क्रीडाक्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन, या सर्व बाबींवर विचार करून भारतीय महिला क्रीडाक्षेत्रातील करिअर करत आहेत. एवढे मोठे शिवधनुष्य पेलण्याची आजच्या महिलांची निश्चितच तयारी होत आहे हे मुलींचे खेळातील प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या वरून दिसून येत आहे.
असे जरी असले तरी महिलांना घरातील जबाबदा-या आणि खेळ यांची सांगड घालताना तारेवरची कसरत करावी लागते. महिलांच्या आयुष्यात लग्न, मातृत्व या व अशा अनेक अडचणींवर मात करून त्या क्रीडाक्षेत्रात करिअर करू शकतात हे अनेक महिला खेळाडूंनी सिद्ध केले आहे. त्या आपल्यावरील जबाबदा-या पार पाडत क्रीडाक्षेत्रात ही भरारी घेत आहेत मात्र त्यासाठी त्यांना घरचा भक्कम पाठिंबा हवा असतो. तरच त्या घरातील जबाबदारी व खेळ यांचे संतुलन व्यवस्थित ठेऊ शकतात.
खेळातील कारकीर्द करताना तिला एक खेळाडू म्हणून नियमित सरावाची आवश्यकता असते. पण म्हणून त्यामुळे घरातील जबाबदारीतून कोणतीही सूट नसते. घरातील जबाबदारी पार पाडताना खेळाकडेही लक्ष देण्याची तारेवरील कसरत करत यश मिळवून दाखवत आहेत. म्हणूनच उल्लेखनीय कामगिरी करणा-या सर्वच महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या खेळाडूंना त्यांचा फिटनेस सांभाळणे हे देखील एक मोठे आव्हान असते.तसेच खेळातील दुखापतीचे प्रमाण अधिक असल्यामुळे कुटुंबातील जबाबदा-या सांभाळत दुखापती टाळण्यासाठी तंदुरुस्ती व त्या खेळातील कौशल्यावर लक्ष द्यावे लागते.
एकूणच क्रीडाक्षेत्रातील करिअर करायचं तर महिलांना कौटुंबिक जबाबदारी , शिक्षण, नोकरी , शारीरिक व मानसिक क्षमता अशा सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करूनच पुढे पाऊल टाकावे लागते. अशा अनंत अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वतः ची मानसिक तयारी ही तितकीच महत्त्वाची असते. या सर्व पाश्र्वभूमीवर महिला खेळाडूंची कर्तबगारी, त्यांची गुणवत्ता, त्यांची जिद्द, ही इतरांसाठी क्रीडाक्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी पथदर्शक व दिशा दाखवणारी ठरेल यात शंका नाही. म्हणूनच एकविसावे शतक हे भारतीय महिला खेळाडूंचे आहे असे म्हटले तर चूक ठरू नये.
– डाॅ. सुवर्णा हितेंद्र देवळाणकर
उपप्राचार्य व शारीरिक शिक्षण शिक्षिका,
सेंट मीरा महाविद्यालय,पुणे