मुंबई- महागाईचा दर जास्त असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने 9 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवले होते. महागाई कमी झाल्याशिवाय व्याजदरात कपात करणे अवघड असल्याचे मत पतधोरण समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
बैठकीचे इतिवृत्त जाहीर करण्यात आले. त्यानुसार जुलै ते मार्च दरम्यान महागाई कमी होत जाण्याची शक्यता आहे. सध्या असलेली महागाई अन्नधान्याच्या महागाईमुळे वाढली आहे. मात्र खरीपाचे पीक मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्याचबरोबर रब्बी उत्पादनही वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात महागाई कमी होण्याची शक्यता पतधोरण समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.
भारतामध्ये लॉकडाऊन कडक असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम झाल्यामुळे विकासदर कमी झाला आहे. मात्र मनुष्यबळाचे कमी नुकसान झाले असल्यामुळे आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था वेग घेणार आहे.
केंद्रीय मंडळाकडून अर्थव्यवस्थेचा आढावा
रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. लॉक डाऊनच्या काळामध्ये केंद्र व रिझर्व बॅंकेने समन्वयाने वित्तीय परिस्थिती मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या बैठकीत रिझर्व्ह बॅंकेच्या सदस्यांबरोबर याचा अर्थ मंत्रालयाचे सदस्य सहभागी झाले होते.