डॉ. सुनील ह. थिगळे
संगणक युगाची भारतात सुरुवात करून अमेरिकेने महासंगणक प्रणाली बनविण्यास मदत करण्यास नकार दिल्यावर भारतीय त्यातही महाराष्ट्राच्या सुपुत्राने आत्मनिर्भरतेचा नारा देत आपल्या स्वाभिमानाला पोहोचलेला धक्का नष्ट करण्यासाठी परम 8000 या महासंगणकाची निर्मिती करून भारताचे नाव जगात उज्ज्वल करणारे पद्मभूषण डॉ. विजयजी भटकर हे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत.
11 ऑक्टोबर 1946 रोजी जन्मदिवस पण भारतीय परंपरा आणि संस्काराचे पुरस्कर्ते पद्मभूषण विजयजी भटकर हे तिथीनुसार विजयादशमी या दिवशीच आपला जन्मदिन साजरा व्हावा या मताचे आहेत.
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मूर्तिजापूरपासून 12 किमी.वर असणाऱ्या उमा नदीच्या काठावर वसलेल्या मुरंबा या अत्यंत लहान खेडेगावात जन्माला आलेले आणि या गावाच्या झाडांच्या फांद्यावरून सुर-पारंब्या, लगोऱ्या, विहिरीत पोहणे, कागदी विमाने करून मोठे होत गेले. वडील श्री. पांडुरंग गणाजी भटकर ऊर्फ भाऊसाहेब आणि मातोश्री निर्मलाताई भटकर यांच हे अपत्य.
आपल्या तीन भाऊ आणि दोन बहिणी यांच्यासह असणाऱ्या कुटुंबात एकोप्याने राहात होते. तेज बुद्धी ही जन्मजात दिलेली दैवी देणगी विजयजींना मिळाल्याची चुणूक त्यांनी इयत्ता दुसरीमध्ये शिकत असताना इ. चौथीची परीक्षा उच्च श्रेणीत पास करून दाखविली. लहानपणापासून कुतुहल बुद्धीने अनेक उलटसुलट प्रयोग करून घरातील अनेक उपकरणांची बोलती बंद केली होती.
पण हेच त्यांचे कुतुहल पुढे त्यांना संगणक शास्त्रज्ञ बनविणारे होते याची कल्पना त्यांच्या मातोश्री निर्मलाताईंना होती. पाळण्यात दिसणारे पोराचे पाय त्यांना स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी या घडामोडीवरून रागवण्याऐवजी नेहमी कौतुकाची थापच पाठीवर मारण्यातच आनंद मानला, यामुळेच मी शास्त्रज्ञ म्हणून घडलो, हे डॉक्टर आपल्याला सांगतात.
वडिलांचे समाजकारण, दातृत्व, समाजातील विषमता दूर करण्यासाठीची धडपड आणि आईकडून मिळालेली दया, जिद्द, सहनशीलता, उद्दमशीलता, कष्ट करण्याची वृत्ती हे सुसंस्कार लहान वयातच जोपासल्याने आजही जगाला आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावणारा हा वैज्ञानिक आपल्या साध्या राहणीने व उच्च विचारसरणीच्या जोरावर जमिनीवर पाय ठेवूनच उभा आहे.
शालेय शिक्षण मुरंबा येथे पूर्ण करून माध्यमिक शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा यांनी स्थापन केलेल्या विद्यालयांमध्ये दाखल झाले. तेथे आजीजवळ राहात असताना तिने दिलेले मनोधैर्य व बळ मोलाचे ठरले. तेथेच संत गाडगेबाबांशी जवळीक साधण्याचा योग आला. गावखेडी, स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा, समानतेचा मंत्र देत “सर्वांसाठी शिक्षण’ आणि गावातील रोजगारक्षमता वाढविण्याचा त्यांचा कानमंत्र आजही डॉ. भटकर यांनी जपला आहे. त्यादृष्टीनं अनेकविध चघउङ मल्टियुनिव्हर्सिटी सारखे उपक्रम चालू ठेवले आहेत आणि सुमारे 1 कोटी 60 लाखांपेक्षाही जास्त तरुणपिढी गावपातळीपर्यंत संगणक साक्षर केली आहे.
महाविद्यलयीन शिक्षणाला अमरावतीतल्या त्यांच्या वडिलांचे स्नेही असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आणि 1965 साली नागपूर विद्यापीठातून इंजिनिअरची बी. ई. पदवी मिळवली परदेशात गलेलठ्ठ पगार देणाऱ्या कंपन्यांना देशाभिमानामुळे स्पष्ट नकार दिले हीच देशाभिमानाची भावना. अनेक तरुणांनी स्वार्थी विचार सोडून भारताच्या विकासाला हातभार लावण्याचा मार्ग धरला असता तर भारत विकसनशील राष्ट्र न राहता केव्हाच विकसित राष्ट्रांच्या यादीत समाविष्ट झाला असता. देशातल्या अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थांवर उच्च पदांवर काम करण्याची संधी तत्कालीन केंद्र सरकारने त्यांना दिली व प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या संशोधनात्मक वृत्तीने यशस्वितेचा ठसा उमटवला.
संगणकयुग जगभर सुरू असताना या प्रणालीत भारताला मात्र संगणकाला लागणारी तंत्रज्ञानाची कमतरता भासत असल्याचे जाणवत होते. संगणकाचा सार्वत्रिक वापर झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही हे ओळखून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी दूरदृष्टीने पथदर्शी प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आणि अत्यंत विचारपूर्वक यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग या केंद्राची उभारणी करण्याचे ठरविले.
याचा कार्यभार एका बुद्धिमान, मेहनती आणि यशस्वितेची हमी देणाऱ्या वैज्ञानिकाची निवड करताना डॉ. विजय भटकर हे एकच नाव त्यांच्यासमोर आले आणि सी-डॅक या संस्थापनेसह कार्यकारी संचालक पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली. हे आव्हान स्वीकारले. संपूर्ण भारतीय बनावटीचा परम-8000 हा महासंगणक (सुपर कंम्प्युटर) बनवून मदत नाकारणाऱ्या महासत्तेला सणसणीत चपराक दिली. एवढ्यावर न थांबता पुढील संशोधन चालू ठेवत परम-10000 ची निर्मिती करण्यात यश संपादन केले.
या सगळ्या संशोधनात्मक गोष्टीत मग्न असतानाच दिल्लीत झह,ऊ करत असताना स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव स्वामीजीची अनेक पुस्तके वाचल्याने व भाषणे ऐकल्याने डॉक्टरांवर पडला होता. आई-आजींच्याकडून लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधील बालपणी अनुत्तरित राहिलेला प्रश्न त्यांना पुन्हा भंडावून सोडू लागले. स्वामी विवेकानंदांच्या साहित्यातून त्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. वेदांच्या गाभ्यात दडलेल्या अनेक उत्तरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात डॉक्टरांनी केली.
त्यातील उकल करताना अनेक वैज्ञानिक आधार आपल्या हिंदू संस्कृतीत आढळून येत गेले. त्याचा मागोवा घेत विवेकानंदांनी हिंदू तत्त्वज्ञानातील अध्यात्माचा अंगीकार केव्हा केला गेला हे समजलेच नाही. आता विचार सुरू झाले होते ते अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधून मानवी जीवनाला समृद्धीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. पुरातन ग्रंथांत उल्लेखलेल्या गोष्टींची उकल आणि जगाने आता लावलेला शोध हे पुराणात आपल्या पूर्वजांनी त्या काळातच केलेले होते. याची अनेक उदाहरणे प्रकाशात आणण्याचे कार्य डॉक्टरांनी केले.
वसुधवै कुटुंबकम जपणारे भटकर आपल्या कुटुंबातील सौ. ललित, मुलगी सौ. संहिता आणि तेजसा, मुलगा नचिकेत, स्नुषा सौ. रिनुल यांना कुटुंबिक वेळ देता येत नसल्याची खंत बाळगतानाच कमी काळात भारतातील संस्कृती, परंपरा, अध्यात्म यांना सर्वदूर प्रसार करण्याच्या कामात आणि संशोधनात वाहून घेण्याचे समाधान मोठे असल्याचे मानतात. अशा या देशाभिमानी भारतीय संस्कृती, परंपरा, ज्ञानसाधनेबरोबरच अध्यात्मिक साधनेतून विज्ञान आणि अध्यात्म्यांची सांगड घालणारा हा परम-संगणकाचा जनक भारतीयांसाठी परमहंसच आहे. त्यांचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे.