-जगदीश काळे
लखनौमध्ये दहशतीची फॅक्टरीच समोर आली आहे आणि आपली गुप्तचर यंत्रणा अशी कमकुवत का पडते, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. दहशतवाद्यांचा कट आधीच उघड झाला ही समाधानाची बाब आहे. जसजसा तपास पुढे जाईल, तसतसे अन्य शहरांमधील दहशतीचे धागेदोरे समोर येतील. जर दहशतवादी आपल्या उद्दिष्टांत यशस्वी झाले असते, तर देशासाठी ते अतिशय घातक ठरले असते.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये दहशतीची फॅक्टरी उघडकीस आल्यानंतर सर्वांची झोपच उडाली. दहशतवाद्यांच्या या शाळेने बरेच प्रश्नही उपस्थित केले आहेत. 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एक मोहीम चालवून राज्यात इसिसशी संबंधित एका पाठोपाठ एक दहशतवाद्यांना अटक केली होती.
तेलंगण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून इसिसच्या खुरासान मोड्यूलमधील दहशतवादी सैफुल्लाह याला चकमकीत ठार करण्यात आले होते. त्यानंतर एटीएसने अनेक जिल्ह्यांमधून अनेक दहशतवाद्यांना अटक केली होती. एटीएसच्या टीमने खुरासान मोड्यूलचा पुरता खात्मा केला होता. या ग्रुपमधील दहापैकी नऊ सदस्य पकडले गेले होते आणि सैफुल्लाह मारला गेला होता. यानंतर लखनौ जवळजवळ शांत झाले होते. आता दहशतवाद्यांनी पुन्हा लखनौमध्ये डोके वर काढले आहे आणि लखनौ हे दहशतवाद्यांचे केंद्र तर बनत नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, मिनहाज आणि मुशीरुद्दीन हे दोघे लखनौचेच रहिवासी आहेत. संशयास्पद घडामोडींमध्ये ते गेल्या काही वर्षांपासूनच सहभागी होते. मिनहाजच्या घरातील लोकांना संशय आला तेव्हा दोघांनी मुशीरुद्दीन याच्या घरातच आयईडी स्फोटके तयार करण्याची योजना आखली; परंतु एटीएसला याची माहिती मिळाली आणि दोघांनाही अटक करण्यात आली. मुशीरुद्दीन पूर्वी ई-रिक्षा चालवीत असे. त्यानंतर त्याने बॅटरीचे दुकान सुरू केले. मिनहाज हा तंत्रज्ञ आहे.
सुरुवातीला तो एका विद्यापीठात काम करीत होता आणि नंतर नोकरी सोडून गाड्यांच्या सेकंड हॅंड बॅटऱ्या तयार करून विकण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला होता. हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होते असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, आपल्याकडील गुप्तचर यंत्रणांना या गोष्टीची माहिती आधी कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. या दोघांबरोबर आणखी काही लोक या कटात सामील आहेत का, याचाही शोध आता घेतला जाईल.
लखनौमधून संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 8 मार्च 2017 रोजी दोन दिवस चाललेल्या चकमकीत उत्तर प्रदेश एटीएसने सैफुल्लाह याला ठार केले होते. सैफुल्लाह हादेखील काकोरी क्षेत्रातच राहात होता. सैफुल्लाहच्या अनेक साथीदारांना एटीएसने अटक केली होती. जानेवारी 2016 मध्ये एनआयएकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने केलेल्या कारवाईत लखनौच्या इंदिरानगर येथून संशयित दहशतवादी अलीम याला अटक केली होती. अलीमची चौकशी करताना अशी माहिती मिळाली होती की, इसिसच्या आठ दहशतवाद्यांची गुप्त बैठक संशयित अलीमच्या इंदिरानगर येथील घरात झाली होती. हरिद्वारमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवून आणून मोठ्या प्रमाणावर हाहाकार उडवायचा, असे या बैठकीत ठरले होते.
आता लखनौमध्ये दहशतवाद्यांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश झाला आहे. दहशतवाद्यांचे जाळे एखाद्या शहरापुरते सीमित असणे शक्य नाही, हेही निश्चित आहे. त्यांना मदत करणारे लोक अनेक शहरांमध्ये वास्तव्यास असू शकतात. जसजसा तपास पुढे जाईल, तसतसे अन्य शहरांमधील दहशतीचे धागेदोरे समोर येतील. तूर्तास तरी लखनौ आणि आसपासच्या भागात बॉम्बस्फोट घडविण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला गेला, हीच समाधानाची बाब आहे.