निकष आडवे आल्याने पालिकेचे मृत कर्मचारी पात्र ठरेनात
पुणे – शहरात करोनाशी दोन हात करताना मृत्युमुखी पडणाऱ्या महापालिकेच्या कामगारांना एक कोटींचे सुरक्षा कवच देण्याची घोषणा पालिकेने केली होती. त्यात केंद्राच्या विमा योजनेतून 50 लाख तर पालिका 50 लाख रुपये देणार होती. मात्र, या विम्यासाठी केंद्राने ठरवून दिलेल्या निकषानुसार पालिकेचे संबंधित मृत कर्मचारी पात्र ठरत नसल्याने ही मदत अद्याप तरी मंजूर झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.
महापालिका प्रशासनाने करोनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच जाहीर केले. त्यात, केंद्राकडून 50 लाखांची मदत तसेच पालिका 50 लाख रुपये अथवा 25 लाख रुपये आणि एका वारसाला पालिकेत नोकरी, असे योजनेचे स्वरूप निश्चित करण्यात आले.
त्यानंतर आतापर्यंत शहरात 222 पालिका कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात, सर्व सफाई सेवकांचा समावेश आहे. या सेवकांच्या मृत्यूनंतर महापालिकेने त्यांना केंद्राची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्राने नेमलेल्या दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे आपले प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र, प्रत्येक प्रस्तावाबाबत निकष पुढे करण्यात आल्याने अद्याप एकाही कर्मचाऱ्यास या विम्याचा लाभ मिळू शकत नसल्याचे समोर आले आहे. विमा कंपनीने निकषांचे कारण दाखवित हात वर केल्यास पालिकेस एक कोटींची मदत पदरमोड करून द्यावी लागणार आहे.
विमा योजनेसाठी केंद्रशासनाने निकष ठरवून दिले आहेत. या योजनेत देशातील तब्बल 22 लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्राच्या निकषानुसारच, प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत. पालिकेने पाठविलेला कोणताही प्रस्ताव नाकारण्यात आलेला नाही. मात्र, तो केंद्राच्या निकषात बसत नसल्याने मंजूरही करता येणार नाही. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) पुन्हा पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.
– पवन कुमार अग्रवाल, क्षेत्रीय प्रबंधक, दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड