कानपूर : कानपूरमधील आठ पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा झाला. कानपूरमधील भौती परिसरात ही घटना घडली.
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला काल अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली होती. यानंतर केल्या गेलेल्या पोलिस चौकशीत विकास दुबेने काही खळबळजनक माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, पोलिसांच्या हत्येनंतर तो त्या पोलिसांचे मृतदेह जाळू इच्छित होता. पोलिसांचे मृतदेह जाळण्यासाठी एकत्रित करण्यात आले होते. त्यासाठी तेल देखील आणले होते. विकासने पोलिसांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले आहे. विकास दुबे म्हटले होते की, आम्हाला सकाळी पोलिस येणार आहेत, याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिस रात्रीच पोहोचले. आम्हाला भीती होती की, पोलिस एन्काऊंटर करतील, अशी माहिती चौकशीत विकास दुबेने दिली होती.
विकास दुबेने चौकशीत सांगितले, सीओ देवेंद्र मिश्रांसोबत त्यांचे आजिबात पटत नव्हते. अनेकदा देवेंद्र मिश्रा यांनी त्याला बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्याने सांगितले होते की, सीओ (देवेंद्र मिश्रा) माझ्या विरोधात आहे. त्याला समोरच्या घरात मारलं होतं. माझ्या साथिदारांनी सीओला मारलं. घटनेनंतर त्यांना सर्व साथिदारांना वेगवेगळे पळून जाण्यास सांगितले होते.
हिस्ट्रीशिटर असलेला विकास दुबे हा शिवराजपूर गावात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिस गेले असता एका इमारतीच्या छतावरुन विकास दुबे आणि त्याच्या गुंडांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. यात पोलिस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह एसओ महेश यादव, चौकी इंचार्ज अनूप कुमार, सब-इंस्पेक्टर नेबुलाल, कॉन्स्टेबल सुल्तान सिंह, राहुल, जितेंद्र आणि बबलू हे शहीद झाले होते.