मुंबई – सतत चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.त्यामुळे नवा वाद पेटला. राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील विधान परत घेण्याची मागणी केली होती. आता यावर राज्यपालांनी भूमिका स्पष्ट केली.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. मी माझ्या सुरुवातीच्या काळात वाचलं होत की, समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू आहेत. मात्र इतिहासातील काही नवीन तथ्य मला लोकांनी दाखवले. पुढील काळात मी या तथ्यांचा विचार करेल, असंही कोश्यारी यांनी म्हटलं.
यावेळी कोश्यारी यांना माफी मागणार का, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर ते काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे राज्यपाल आपल्या विधानावर ठाम असल्याचं दिसून येतं.