पुणे – पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी राम नदी संवर्धनाचा विषय सातत्याने लावून धरला आहे. मात्र, संसाधने उपलब्ध नसल्याने त्यास पूर्णत्व येऊ शकले नाही. या संवर्धन कार्यासाठी राम नदीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या कामात या संस्थांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या राम नदी पुनरुज्जीवन चळवळीवर आधारीत “उपेक्षित राम नदी’ आणि “रामनदी इल्युसिव रिव्हर’ या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी (दि.19) पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पुनरूज्जीवन अभियानचे संयोजक वीरेंद्र चित्राव, डॉ. गुरूदास नूलकर, अनिल गायकवाड, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, पुणे शहर महासचिव संदीप खर्डेकर उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, गेल्या काही वर्षात अनेक शहरांमधील नद्यांच्या प्रदूषणाचा वेग झपाट्याने वाढला असून त्यासंदर्भात विविध सामाजिक संस्था पुढाकार घेऊन काम करीत आहेत. पुण्यात देखील अशा संस्था कार्यरत आहेत. मात्र केवळ संस्था आणि महापालिकेच्या प्रयत्नातून हे काम होणार नाही, तर पर्यावरण रक्षण हा प्रत्येक नागरिकाचा स्वभाव झाला पाहिजे.
चित्राव म्हणाले की, ही दोन पुस्तके रामनदीवरील हा पहिलाच अधिकृत दस्तऐवज आहे. हे अभियान राबविण्यामध्ये 55 महाविद्यालये, 25 शाळा, किर्लोस्करच्या तीन कंपन्या आणि 100 पर्यावरणतज्ज्ञ यांचा सहभाग आहे.