रत्नागिरी : भाजपमध्ये मागच्या ४० वर्षांपांसून असणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, खडसेंनी भाजपमध्ये आपल्यावर अन्याय झाला असल्याचे सांगत पक्ष सोडला आहे. याच आरोपांना आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपवर आरोप करण्यापेक्षा खडसेंनी आत्मचिंतन करावे असा खोचक सल्ला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिला आहे.
एकनाथ खडसेंना मंत्रिपद मिळावं. फक्त भाजपवर आरोप करण्यासाठी त्यांना पक्षात घेतले जाऊ नये, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे. खडसेंनी आरोप करताना स्वतः केलेले उद्योग काय होते, त्याचा विचार करावा, असा थेट हल्लाही प्रसाद लाड यांनी केला आहे.
“खडसेंनी आरोप करताना स्वतः केलेले उद्योग काय होते त्याचा विचार करावा. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपवर आरोप करण्यापेक्षा खडसेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे,” असेही प्रसाद लाड म्हणाले.