विद्या भवन्तु विजयायते हे ब्रीदवाक्य घेऊन श्री समर्थांच्या आशीर्वादाने व विचारांनी प्रेरित होऊन उदयास आलेले श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ व त्याअंतर्गत चिंबळी फाटा या ठिकाणी प्रज्ज्वलीत झालेली ज्ञानज्योत म्हणजे श्री समर्थ स्कूल व कॉलेज चिंबळी फाटा म्हणजे ज्ञान, सद्विचार व दूरदृष्टीचे प्रखर तेजोवलय घेऊन जन्मास आलेला व अखंड वाहत राहण्याचे व्रत घेतलेला ज्ञानसागरच होय.
अशा या ज्ञानसागराच्या माध्यमातून पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्याच्या एकाच ध्येयापोटी श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी बबनराव गवारे सर व त्यांच्या सौभाग्यवती व श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव विद्याताई शिवाजीराव गवारे या दाम्पत्याने घराघरात ज्ञानज्योत पेटवण्याचा वसा हाती घेतला.
सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतला असताना, कुठलाही राजकीय वारसा नसताना समाजातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा व सामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही आपल्या पाल्यास “वाघिणीचे दूध’ समजल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा लाभ देता यावा या उद्देशाने गवारे सर व मॅडम यांनी शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या पवित्र कार्यास आरंभ केला.
गरिबी, असहायता या गोष्टींची उत्तम जाण ठेवून कमीत कमी खर्चात अधिकाधिक चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण देण्याचे ध्येय उराशी बाळगून उदयास आलेल्या या शिक्षण संस्थेच्या शाखा जाणकार पालकवर्गाच्या सहकार्याने व समर्थ शिक्षण संस्थेच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या योगदानामुळे झपाट्याने वाहू लागल्या. सध्याच्या स्थितीला खराबवाडी, खालुंब्रे, काळुस, केळगाव, निघोजे, खेड, चिंबळी फाटा अशा एकूण सात शाखा ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत व थोड्याच दिवसांत ही संख्या तीनशेच्या घरात जाईल, अशी सर्वांची मनोकामना आहे. अशा या विविध ठिकाणच्या शाखांमधून जवळपास तीन हजारांच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व जवळपास तीनशे कुटुंबांना रोजगार मिळाला आहे व याचे श्रेय श्री. समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ या नावाशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येकाचे आहे व हे कुटुंब एकत्रित व संघटित ठेवणाऱ्या या गवारे सर मॅडम यांचे आहे.
शिक्षण घेत असताना परिस्थितीजन्य उद्भवणारी संकटे व या संकटांवर जिद्द, चिकाटी व परिश्रमाने मात करायची कसब याची पूर्वकल्पना अध्यक्ष मा. श्री. गवारे सर यांना असल्याने स्वावलंबी शिक्षणाची संकल्पना सरांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू केली. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वकमाईतून शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. या माध्यमातून मागेल त्याला काम मिळवून देण्याचं मौलिक कार्य सरांनी केले. या सर्व संकल्पना सत्यात उतरविण्याच्या कार्यात श्री समर्थ पतसंस्था या सहकारी संघटनेने सदैव मोलाचे असे सहकार्य केले.
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ मोई अंतर्गत सुरू असलेल्या सात शाखा म्हणजे सात पवित्र ज्ञानगंगांचा संगम होय. अशा संगमातून एक दिवस अवाढव्य ज्ञानसागराचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. या विविध शाखांमधून आधुनिक शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना विविध कलाकृतींच्या माध्यमातून, नवनवीन ज्ञान देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. येथे ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये कराटे, स्केटिंग, मल्लखांब, बॉक्सिंग, कुस्ती, कबड्डी, खो-खो रनिंग यांसारख्या क्रीडाप्रकारांचे शिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून दिले जाते. समाजातील संस्कृती जपण्याच्या हेतूने शिवजयंती, स्वामी विवेकानंद जयंती, पालखी सोहळा, दहिहंडी, गोपाळकाला, भोंडला यांसारखे उपक्रम उत्साहाने घेतले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला आव्हान देणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. याला मिळालेली दाद म्हणजे वेळोवेळी येथील विद्यार्थ्यांनी मिळवलेली सुवर्णपदके होय.
अशा प्रकारच्या स्तुत्य कार्याबरोबरच सद्विचारांचे धडे विद्यार्थ्यांना देण्याच्या उद्देशाने विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या बालबैठकीच्या माध्यमातून समर्थ विचारांची जोपासना केली जाते. या कार्यात स्वतः अध्यक्ष गवारे सर, मॅडम हिरीरीने पुढाकार घेतात. मार्गदर्शन करतात. तसेच दरवर्षी किल्लेदर्शन आयोजित करतात. अशा प्रकारे, ज्ञान, सत्संग, सद्विचार, पावित्र्य, आधुनिकता, स्वयंप्रेरणा, जिल्हा अशा सप्तरंगांची झालर असलेल्या या ज्ञानमंदिराचे एक दिवस ज्ञानपीठात नक्कीच रूपांतर होईल यात शंकाच नाही.
(शब्दांकन – विष्णू जानकू भद्रे)